लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील गावांचा विविध योजना राबवून कायापालट करून नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणा-या कल्पक ग्रामसेवकांची सेवा पाहून त्यांचे गुणांकन करून आदर्श पुरस्कार दिला जातो. २०१९-२० ते २०२२-२३ पर्यंतच्या कालावधीत आदर्श काम केलेल्या ३९ ग्रामसेवकांना लातूर जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर केला आहे. या निर्णयामुळे ग्रामसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करून ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडविण्यास सर्वतोपरी सा करणा-या ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड जिल्हा परिषद स्तरावर करण्यासाठी सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आदर्श ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी पुरस्कारासाठी निवड समिती गठीत करण्यात आली होती.
जिल्हा परिषद लातूर अंतर्गत गट स्तरावरून आदर्श ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी पुरस्कारासाठी ६३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांनुसार निवड समितीच्या बैठकीत ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचे चारित्र्य प्रमाणपत्राच्या अधिन राहून ३९ ग्रामसेवकांची आदर्श ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी म्हणून २०१९-२० ते २०२२-२३ पर्यंत वर्षनिहाय निवड करण्यात आलेली आहे. २४ जणांचे प्रस्ताव विविध कारणास्तव अपात्र करण्यात आले आहेत. पुरस्कारप्राप्त ग्रामसेवकांच्या सेवा पुस्तकात आदर्श ग्रामसेवक पुरस्काराची नोंद मात्र होणार आहे.