निलंगा : प्रतिनिधी
तालुक्यातील मुदगड, एकोजी, सरवडी व कोकळगाव येथील शेतक-यांनी शेतीसाठी पूर्ववत ८ तास वीजपुरवठा देण्याची मागणी करीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सध्या शेतीसाठी मिळणारा वीजपुरवठा ८ तासांवरून कमी करून ५ तास करण्यात आल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण होत असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ५ तासांचा वीजपुरवठा अपुरा पडत असल्याने शेतीची कामे विस्कळीत होत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे ८ तास नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.
या संदर्भात महावितरण प्रशासनाने शेतक-यांच्या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान पुढील तीन दिवसांत प्रश्न मार्गी लागला नाही तर दि. ७ जूनपासून मुदगड येथील महावितरण उपकेंद्रावर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास अथवा शेतक-यांचे नुकसान झाल्यास त्यास महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर देवानंद मुळे, अनंत इंगळे, विशाल मुंडे , श्रीकांत मुळे , अनंत मोहिते पाटील, विशाल मुळे , रमेश हराळे, तात्याराव मुळे, महेश मुळे आदी शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
















