30.2 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रअंबादास दानवे यांचे निलंबन मागे?

अंबादास दानवे यांचे निलंबन मागे?

दानवेंनी व्यक्त केली दिलगिरी, आज होणार निर्णय
मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनावर गुरुवारी फेरविचार होणार आहे. निलंबन झाल्यानंतर दानवे यांनी बुधवारी सभापती डॉ. नीलम गो-हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. विरोधी पक्षनेत्यांकडूनही सभापतींना निलंबनाच्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती. गुरुवारी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यावर निवेदन करणार आहेत. दिलगिरी व्यक्त केल्यानंतर दानवे यांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे.

सोमवार १ जुलै रोजी परिषदेतील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आमदार प्रसाद लाड यांना उद्देशून अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर त्यांचे सभापती डॉ. गो-हे यांनी पाच दिवसांसाठी निलंबन केले. या निलंबनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली होती. बुधवारी दानवे यांनी सभापतींना पत्र लिहित सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू-परंतु नाही असे स्पष्ट केले. या पत्राचा दाखला देत आमदार अनिल परब यांनी सभापतींना निलंबनाचा फेरविचार करण्याची विनंती केली.

विरोधी पक्षनेत्यांशिवाय सभागृह चालू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर यावर निर्णय द्यावा अन्यथा तोपर्यंत आपण सभागृहात खाली बसून कामकाज पाहू, असा इशारा देत इतर विरोधी पक्षातील आमदारांसह सभागृहातच खाली बसले. मात्र, त्यावर सभापती यांनी लक्षवेधी मांडून झाली की त्यावर चर्चा करण्याचे आश्वासन देत सभागृहाचे कामकाज चालण्याची विनंती केली. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR