सुभाष कदम
धाराशिव : धाराशिव तालुक्यातील खेड येथील शेतकरी विनोद भागवत टिकले यांना अडीच एकरांतील कोथिंबीर पिकाने ६ लाख ७१ हजार रूपये दिले. यासाठी त्यांना लागवडीपासून काढणीपर्यंत ४५ हजारांचा खर्च आला. खर्च वजा जाता त्यांना निव्वळ ६ लाख २६ हजारांचा नफा झाला. शेतकरी उन्हाळ््यात कमी कालावधीत निघणा-या कोथिंबिरीचे पीक घेतो. अनेकदा भाव पडतात, तेव्हा खर्च पाण्यात जातो. परंतु जेव्हा चांगला दर मिळतो, तेव्हा शेतक-याला लॉटरी लागते. धाराशिव तालुक्यातील या शेतक-याला एका अर्थाने लॉटरीच लागली आहे.
कोथिंबीर हे अवघ्या ३५ दिवसांत काढणीला येणारे पीक… एकरी १८ ते २० हजारांचा खर्च… चांगला भाव मिळाला तर तो शेतकरी लखपती झालाच म्हणून समजा. त्यामुळे अलिकडच्या पाच-सहा वर्षांत धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी कोथिंबीर या मसालावर्गीय पिकाकडे वळले आहेत. कोथिंबिरीची लागवड, पाणी देण्याची पद्धत यामध्ये आधुनिकता आल्याने व उत्पादन मोठ्या प्रमाणात निघत असल्याने हे पीक शेतक-यांना आर्थिकदृष्ट्या परवडत आहे. कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी थेट बांधावर येऊन खरेदी करतात. या पिकाची काढणी व्यापारी स्वत: मजूर आणून करतात. तसेच बांधावर ठरलेले पैसे शेतक-यांना देतात. त्यामुळे अनेक शेतकरी अन्य पारंपरिक पिकांना फाटा देत कोथिबींर पिकाला प्राधान्य देत आहेत.
खेडचे शेतकरी विनोद भागवत टिकले यांनी दि. १८ मार्च २०२६ रोजी अडीच एकरात कोथिबिरीची (धने) पेरणी केली. आवश्यक असणारे खत पेरतानाच दिले. रेन पाईप व मिनी स्प्रींक्लरच्या सहाय्याने पिकाला पाणी दिले. धने उगवल्यानंतर खुरपणी केली. दोन फवारणी केल्या. यासाठी त्यांना ४५ हजार रुपये खर्च आला. ३५ दिवसांनंतर पीक काढणीला आल्यानंतर पळसवाडी (ता. धाराशिव) येथील व्यापारी अप्पा शिंदे यांनी थेट बांधावर येऊन अडीच एकरांतील कोथिंबिरीचा फड ६ लाख ७१ हजार रुपयांना खरेदी केला. खर्च वजा जाता विनोद टिकले यांना अडीच एकरांतून ६ लाख २६ हजारांचा नफा झाला.
कोथिंबीर पिकाने
कायापालट झाला
खेड येथील शेतकरी विनोद भागवत टिकले हे प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. यंदा विनोद टिकले यांनी चारवेळा एकरभर कोथिंबिरीची पेरणी केली. त्यांना तीनवेळा बरा दर मिळाला. यातून त्यांना सव्वातीन लाख रूपये मिळाले. उन्हाळी हंगाम असल्याने चौथ्यावेळी त्यांना चांगला दर मिळाल्याने अडीच एकरातून ६ लाख ७१ हजार रुपये मिळाले. कोथिंबीर पिकाने त्यांचा कायापालट केला असल्याचे विनोद टिकले यांनी सांगितले.
अनेक गावे झाली
आर्थिकदृष्टया समृद्ध
गेल्या पाच-सहा वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात कोथिंबीर पिकाची लागवड वाढली. कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी ही गावोगावी तयार झाले आहेत. हे व्यापारी मुंबई, पुणे, नागपूर, बेंगलोर यासारख्या मोठ्या महानगरात कोथिंबीर पाठवितात. त्यांच्याकडे काढणीसाठी मजुरांची यंत्रणा आहे. कोथिंबीर हे नाजूक पीक असल्याने वेळेत काढणी व बाजारपेठेत वेळत दाखल होणे गरजेचे असते. ज्या शेतक-यांना कोथिंबीर पिकाचे गणित समजले ते शेतकरी नेहमी हे पीक घेऊन आर्थिक समृद्ध झाले आहेत. परिणामी अनेक गावेही समृद्ध झाली आहेत.
















