28.5 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeमहाराष्ट्रअन्त्ययात्रा निघाली तरी चालेल, माघार नाही

अन्त्ययात्रा निघाली तरी चालेल, माघार नाही

अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा निर्धार

अमरावती : आमची अन्त्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी केला आहे.

दरम्यान, शेतक-यांना कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू बेमुदत अन्नत्याग करणार आहेत. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीजवळ आजपासून (ता. ८) या आंदोलनाची सुरुवात होईल. अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोझरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली काढणार आहे. या रॅलीत २० हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. आंदोलनापूर्वी बोलताना बच्चू कडू म्हणाले, ‘आमची अन्त्ययात्रा निघाली तरी चालेल. पण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आता आम्ही मागे हटणार नाही.’

बच्चू कडू म्हणाले, शेतक-यांची कर्जमाफी, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर मच्छिमारांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात शासनाकडून आश्वासने मिळाली होती. परंतु त्याची पूर्तता झाली नाही. आता जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन थांबणार नाही. शेतमालांचे भाव पडलेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना हमीभाव दिला पाहिजे. घरकुलाचा मुद्दा आहे. मच्छिमारांचा, मेंढपाळांचा मुद्दा आहे. अनेक वेळा पत्र देऊनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे अन्नत्याग आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली आहे.

दिव्यांगांना मिळणारे मानधन वेळेवर मिळत नाही, त्यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, अधिकारी आणि मंत्र्यांचे पगार वेळेवर होत आहेत. परंतु दिव्यांगांचा निधी वेळेवर मिळत नाही. निराधारांचे पगार वेळेवर होत नाहीत. सरकार जाणीवपूर्वक मुद्यांच्या लढाईपासून लोकांना दूर करत आहे. त्यामुळे आता जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही. माझी अन्त्ययात्रा निघाली, तरी आम्ही आमच्या मुद्यांपासून दूर होणार नाही, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

राज-उद्धव यांनी मुद्यांवर एकत्र यावे
राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, ठाकरेंचा हा कौटुंबिक विषय आहे. मुद्दे घेऊन ते एकत्र झाले तर फार चांगले होईल. राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका घरातील आहेत, म्हणून एकत्र येऊ नये, तर मुद्यांवर एकत्र आले पाहिजे. मुंबई वाचवणे फार महत्त्वाचे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR