केंद्रीय विमान उड्डयन मंत्री नायडू यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एएआयबीची चौकशी लावली आहे. एएआयबी ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते, अशी तरतूद आहे. त्यामुळे या चौकशीला विशेष महत्त्व आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी २ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार आता चौकशी सुरू झाल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना एएआयबीची स्थापना करण्यात आली होती. आपल्या देशात विमान दुर्घटनेच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याकरिता संघटना पाहिजे म्हणून या चौकशी समितीची निर्मिती करण्यात आली होती.
अपघातसंदर्भात दोन गोष्टी चुकीच्या असू शकतील. एक तर वैमानिकाचा दोष किंवा विमानाचा दोष. त्यामुळे अपघाताची सगळी चौकशी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा केला होता. एएआयबीला चौकशीचे सर्वाधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने अपघात की घातपात या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात असताना आता ही चौकशी सुरू झाली आहे.
आ. रोहित पवारांनी
केली होती मागणी
अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात यावरून शंका उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता केंद्रीय मंत्रालयाकडून या विमान अपघाताची एएआयबी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

