22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयअमित शहा तिरुपतीला तर जे. पी. नड्डा श्री नैना देवीच्या चरणी

अमित शहा तिरुपतीला तर जे. पी. नड्डा श्री नैना देवीच्या चरणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. आज म्हणजेच १ जून रोजी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून, ३० मे रोजी लोकसभेचा प्रचारदेखील थांबला. दरम्यान, हा प्रचार संपताच अनेक नेते देवाचा धावा करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतील विवेकानंद मेमोरिअल रॉक येथे ध्यान करण्यासाठी गेले, तर गृहमंत्री अमित शहांनी कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीदेखील आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथे कुलदेवीच्या मंदिरात पूजा केली.

दरम्यान, भाजपाचे इतर बडे नेतेही मंदिरांना भेटी देत आहेत. निवडणुकीच्या प्रचारानंतर आता गृहमंत्री अमित शहा हे कुटुंबासह तिरुपती बालाजी येथे नतमस्तक झाले आहेत. तर, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही त्यांच्या कुटुंबासह हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील कुलदेवी शक्तिपीठात पूजा केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ही अयोध्या येथे राम लल्लाचे दर्शन घेण्यासाठी गेले होते.

गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या पत्नी सोनल शहा यांनी शुक्रवारी तिरुपती बालाजी येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वर स्वामींची प्रार्थना केली. यावेळी तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी यांनी अमित शहा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. अमित शहा आणि पत्नी सोनल शहा यांनी अभिषेकही केला. दर्शनानंतर मंदिराच्या पुजा-यांनी शहा यांना वैदिक मंत्रांचा आशीर्वाद दिला. तसेच मंदिर अधिका-यांनी त्यांना देवतेचा प्रसाद आणि छायाचित्र भेट म्हणून दिले.

दुसरीकडे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथील शक्तिपीठ श्री नैना देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरात त्यांनी विधीपूर्वक माता राणीची पूजा केली. फोटो शेअर करताना त्यांनी म्हटले की, ‘‘आज मला हिमाचल प्रदेशातील देवभूमीच्या बिलासपूरमधील माझ्या कुटुंबासह कुलदेवी मंदिर आणि आदिशक्ती माँ नैना देवीजी मंदिरात जाण्याचा बहुमान मिळाला. शिवालिक पर्वतरांगेत वसलेल्या या प्रसिद्ध शक्तिपीठात पूजा केल्याने लोकांमध्ये नेहमीच नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण होते. यावेळी सर्व देशवासीयांच्या सुख, सौभाग्य, आरोग्य आणि भरभराटीसाठी माता राणीने सर्वांना आशीर्वाद देवो अशी प्रार्थना केली.’’

पंतप्रधान मोदी ४५ तास ध्यान करणार
शुक्रवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारी येथे पोहोचले आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये ध्यानस्थ झाले. यापूर्वी कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या भगवती अम्मान मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान सुरू केले, जे १ जूनच्या संध्याकाळपर्यंत सुरू राहील. पंतप्रधान मोदी त्याच खडकावर बसून ध्यान करत आहेत, ज्यावर विवेकानंदांनी ध्यान केले होते. या काळात पंतप्रधान मोदी फक्त नारळपाणी आणि द्राक्षाचा रस घेणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR