अकोला : अकोल्यात ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीत पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘जागतिक आदिवासी दिन’ हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असतानाही भाजपने तो साजरा केला नाही. ज्यांनी साजरा केला त्यांच्यावर लाठीमार करून भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? आदिवासींचा एवढा द्वेष बरा नसल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार ट्विट करत म्हणाले की, आदिवासी हा देशाचा मूळ निवासी आहे, मात्र आदिवासी समाजाला आजही दुय्यम वागणूक दिली जाते. काल अकोले येथे निघालेल्या मिरवणुकीत ‘जागतिक आदिवासी दिना’च्या दिवशीच या सरकारने आदिवासींवर लाठीचार्ज केला आणि स्वत: आमदारांनीच याची कबुली दिली. आदिवासी नागरिकांवर केलेल्या या लाठीचार्जचा जाहीर निषेध!
अजितदादांच्या आमदाराने काढलेल्या मिरवणुकीत गृहविभागाकडून लाठीचार्ज केला जातो, याचा अर्थ सरकारमधील तीन पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करत आहेत, हेही यानिमित्ताने स्पष्ट होते. पण कुरघोडीच्या राजकारणात सत्ताधा-यांकडून आदिवासींना दुय्यम वागणूक मिळत असेल तरी आम्ही मात्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. ‘जागतिक आदिवासी दिन’ हा आदिवासींच्या स्वाभिमानाचा दिवस असतानाही भाजपाने तो साजरा केला नाही आणि ज्यांनी साजरा केला त्यांच्यावर लाठीमार करून भाजपाला नेमकं काय साध्य करायचंय? आदिवासींचा एवढा द्वेष बरा नाही..!
एकत्र येऊ नये म्हणून गृहखात्याने लाठीचार्ज केला
रोहित पवार म्हणाले की, राज्याचे आदिवासी मंत्री यांनी कुठेही जागतिक आदिवासी समाजाच्या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या नाहीत. भाजपच्या कोणत्याच नेत्याने शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण भाजपचे तसे आदेश होते. नागपूरमध्ये आदिवासी समाजाचा मोठा कार्यक्रम होता त्याला देखील परवानगी दिली नाही. भाजपकडून आदिवासी वेगळे आणि इतर लोक वेगळे असा प्रयत्न सुरू आहे. अजित पवारांच्या पक्षाचा अकोले येथील आमदाराने एक कार्यक्रम घेतला होता. काल आदिवासी दिनानिमित आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला. समाज एकत्र येत होता. तो एकत्र येऊ नये म्हणून गृहखात्याने लाठीचार्ज केला.
खनिज मिळवण्यासाठी आदिवासी समाज शब्द बदलला
त्यांनी सांगितले की, भाजपने आदिवासी समाजाला आता वेगळे नाव दिले आहे. ते आदिवासी म्हणत नाहीत ते वनवासी म्हणतात. आदिवासी या शब्दाचा अर्थ काय होतो तर आधीपासून वास करणारे. वनवासी म्हणजे जे वनात राहणारे असे त्यांचे म्हणणे आहे, कारण आदिवासी समाज ज्या ठिकाणी राहतो त्याच्या खाली खनिजे दडली आहेत. ते खनिज मिळवण्यासाठी त्यांनी आदिवासी समाज शब्द बदलला. यामुळे असे म्हणता येईल की हे वनवासी आहेत त्यामुळे हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे यांचा त्या जमिनीवर हक्क नाही.