22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार सांभाळण्यासाठी नेत्यांची धावपळ

आमदार सांभाळण्यासाठी नेत्यांची धावपळ

विधान परिषदेची उद्या निवडणूक, सर्वच पक्षांना क्रॉस व्होटिंगची भीती

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभेतून विधान परिषदेवर पाठवण्यात येणा-या ११ जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होत असून सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे. काँग्रेस वगळता सर्व पक्षांना मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी बाहेरून रसद लागणार असल्याने एक एका मताला मोठी किंमत आली आहे. गुप्त मतदानात दगाफटका होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात असून शिवसेना व राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलात हलवले आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात असून मतांच्या रस्सीखेचीत कोणाची विकेट जाणार याबद्दल वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.

विधानसभेतील २८८ पैकी १४ जागा सध्या रिक्त आहेत त्यामुळे १७४ आमदार या निवडणुकीत मतदान करणार असून विजयासाठी २३ (२२.८४) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. विधानसभेत सध्या भाजपाचे १०३, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३९, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ४०, काँग्रेसचे ३७, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १५ व राष्ट्रवादीच्या पवार गटाचे १२ आमदार आहेत. या शिवाय अपक्ष व छोट्या पक्षांचे २८ आमदार आहेत. काँग्रेसकडून केवळ प्रज्ञा सातव या एकमेव उमेदवार असल्याने त्यांना इतरांच्या मदतीची आवश्यकता नाही. काही मतं फुटली तरी त्या निवडून येऊ शकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसने आपली अतिरिक्त मतं ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना देण्याचे मान्य केले आहे. खबरदारी म्हणून पहिल्या पसंतीची सर्व मतं प्रज्ञा सातव यांना देऊन दुसरी पसंती नार्वेकर यांना दिली जाईल. तसे झाल्यास १० ते १२ मतं नार्वेकर यांना मिळतील. ठाकरे गटाची स्वत:ची मते व काँग्रेसकडून मिळालेल्या अतिरिक्त मतांच्या आधारे नार्वेकर यांची नैय्या पार होऊ शकते.

भाजपाने या निवडणुकीत पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत हे ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. ५ उमेदवार जिंकून आणण्यासाठी त्यांना किमान ११५ मतांची आवश्यकता आहे त्यामुळे वरच्या १२ मतांसाठी मित्रपक्ष व अपक्षांवर मदार आहे. या शिवाय पक्षातील असंतुष्ट लोकांकडून दगा फटका होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

शिंदे गटाने २ उमेदवार उभे केले असून त्यांना काही मतं बाहेरून मिळवताना पक्षातील मतं फुटणार नाहीत याचीही काळजी घ्यावी लागेल. ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचे अनेकांशी व्यक्तिगत संबंध आहेत त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अजित पवार गटाचे २ उमेदवार रिंगणात असून त्यांना बाहेरील ६ मतांची गरज आहे. शेकापचे जयंत पाटील यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे.

पवार गटाचे १२ आमदार आहेत. शेकापचे एक आमदार आहेत. ही सर्व मतं इकडे तिकडे न जाता त्यांना मिळाली तरी त्यांना आणखी १० मतं लागणार आहेत. ही ती कोणाची खेचून आणणार यावर निवडणुकीत पडणारा बारावा उमेदवार कोण असेल, हे ठरणार आहे.

काँग्रेसकडे ३७ मतं आहेत व त्यांच्या एकच उमेदवार आहेत. खबरदारी म्हणून पहिल्या पसंतीची सर्व मतं प्रज्ञा सातव यांना देऊन दुसरी पसंती नार्वेकर यांना दिली जाईल. तसे झाल्यास १० ते १२ मतं नार्वेकर यांना मिळतील. ठाकरे गटाची स्वत:ची मते व काँग्रेसकडून मिळालेल्या अतिरिक्त मतांच्या आधारे नार्वेकर यांची नैय्या पार होऊ शकते. मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी शिंदे गटाने आपल्या आमदारांना ताज लॅड इंड येथे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलात आपल्या आमदारांची व्यवस्था केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR