मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या पुनर्विचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. चित्रा वाघ यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. आम्हाला हलक्यात घेऊ नका म्हणत अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरील पुनर्विचार याचिकेचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले, मात्र मनीषा कायंदे यांच्या जुन्या ट्विटवरून वाद संजय राठोड यांच्यावर पोहोचला. अनिल परब यांनी चित्रा वाघ यांना सरड्याप्रमाणे रंग बदलतात, अशी टीका केली. यावरून चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. चित्रा वाघ यावेळी चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. अनिल परब यांच्यावर त्यांनी अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
सभागृहात मनीषा कायंदे यांनी दिशा सालियनचा विषय मांडला. दिशा सालियनच्या वडिलांनी स्वत: पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावर चर्चा सुरू होती. एसआयटीचा रिपोर्ट काय आहे, तो समोर यावा, एवढीच मी विनंती केली होती. जे खरं आहे ते जनतेसमोर आलं पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. मात्र विरोधकांनी संजय राठोड यांचा विषय मध्येच घेतला. संजय राठोड यांच्याबाबत तुम्ही काय केलं असं विरोधक म्हणाले, पण मला जे करायचं होतं ते मी केलं. जे मला दिसलं, जे पुरावे आले, त्याच्यावर लढले मी. तुम्ही इथे तोंड शिवून बसला होतात का आणि मला विचारतात ते परत मंत्रिमंडळात कसे आले. पण अनिल परब यांच्यात हिंमत आहे का उद्धव ठाकरे यांना विचारायची. त्यांनीच क्लीन चिट दिली होती त्यांना
.
संजय राठोड परत मंत्रिमंडळात का आले, याचे उत्तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. मात्र सोयीप्रमाणे अनिल परब यांचे राजकारण सुरू आहे आणि महिलांवर दादागिरी सुरू आहे. तुमच्यात खरंच हिम्मत असेल ना तर जाऊन उद्धव ठाकरेंना विचारा, की त्यांनी क्लीन चिट का दिली. अनिल परब यांच्यासारखे ५६ बघितले आहेत, तुमच्यासारखे पायाला बांधून फिरते, अशा शेलक्या शब्दांत चित्रा वाघ यांनी टीका केली.
काय म्हणाले होते अनिल परब?
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना सीबीआयने क्लीन चिट दिल्यानंतर मनीषा कायंदे यांनी ट्विट केलं होतं. ते ट्विट अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवलं. सीबीआयने आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिली त्यावेळचे हे ट्विट आहे. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही.. याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे.