नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आयपीएल २०२५ या १८ व्या हंगामाचा शेवटचा सामना ३ जून रोजी गुजरातमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. यावेळी होणा-या समारोप समारंभात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा जल्लोष केला जाणार आहे. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खास तयारी केली असून तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यात आले. दहशतवाद विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरला अनेक देशांनी पाठिंबा दिला आहे. आता ‘ऑपरेशन सिंदूर’चा विजय आयपीएल २०२५ च्या समारोप समारंभात साजरा केला जाणार आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यात बीसीसीआयने खास पाहुण्यांना आमंत्रित केले आहे. ३ जून रोजी आयपीएलचा अंतिम सामना सुरू होण्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सोहळा होणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संरक्षण प्रमुख तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांना आमंत्रित केले आहे.
सोमवारी (२६ मे) पंजाब किंग्जने जयपूरला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला ७ विकेटने पराभूत केले. हा दोन्ही संघांचा प्लेऑफपूर्वीचा अखेरचा साखळी सामना होता. पंजाबने या विजयासह पॉईंटस टेबलमध्ये अव्वल क्रमांकावर उडी मारली. इतकेच नाही, तर त्यांनी पहिल्या दोन क्रमांकामध्येही आपले स्थान पक्के केले आहे. त्यामुळे त्यांना क्वालिफायनर-१ सामन्याचे तिकीटही पक्के केले. ते आता त्यांच्या घरच्या मैदानात म्हणजेच मुल्लनपूर येथे क्वालिफायर-१ चा सामना खेळताना दिसतील. मात्र, मुंबई इंडियन्सला या पराभवामुळे चौथ्या क्रमांकावरच राहावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आता आरसीबी किंवा गुजरातविरुद्ध एलिमिनेटर सामना खेळावा लागेल.