मुंबई : प्रतिनिधी
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सलग दोन वेळा रेपो रेटमध्ये कपात करीत कर्जदारांना दिलासा दिला. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. दोन्ही वेळा प्रत्येकी २५ बेसिस पॉईंटची कपात झाली. यामुळे रेपो रेट ६.५० वरून ६ टक्क्यांवर आला. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची बैठक ४, ५, ६ जूनला होणार आहे. या बैठकीतही रेपो रेटमध्ये कपात करण्याचा विचार होऊ शकतो. त्यामुळे अखेरच्या दिवशी ६ जूनला रेपो रेट कपातीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
आरबीआयच्या जून महिन्यातील पतधोरण विषयक समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. किरकोळ महागाई सलग २ महिन्यांत ४ टक्क्यांच्या खाली राहिल्याने रेपो रेट २५ बेसिस पॉईंटने कमी केला जाऊ शकतो, अशी आशा आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यास तो ५.७५ टक्क्यांवर येऊ शकतो.
एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईचा दर गेल्या ६ वर्षांत निच्चांकी पातळीवर राहिला आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर ३.१६ टक्के नोंदला गेला. खाद्य पदार्थ महागाईचा दर ऑक्टोबर २०२१ पासून पहिल्यांदा निच्चांकी पातळीवर आहे. डाळ आणि धान्याच्या किमती घटल्या आहेत. मान्सूनचा पाऊस चांगला होऊ शकतो, असा अंदाज आहे. या बाबींचा विचार करून रेपो रेटमध्ये कपात होऊ शकते. आरबीआयने एप्रिल २०२५ मध्ये पतधोरण जाहीर करताना सर्वसमावेशक धोरण ठेवले होते. त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महागाई कमी करण्याऐवजी विकासाला प्राधान्य देण्याची भूमिका ठेवली होती.
रेपो रेट ५ टक्क्यांपर्यंत शक्य?
नोमुराच्या एका रिपोर्टनुसार २०२५ च्या दुस-या तिमाहीत महागाईचा दर ३ टक्क्यांच्या खाली राहू शकतो तर दुस-या सहामाहीत तो ३.३४ टक्के राहू शकतो. आरबीआयच्या नियमानुसार महागाईचा दर ४ टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आरबीआयकडून २०२५-२६ मध्ये अजून ५ वेळा पतधोरण जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे रेपो रेट ५ टक्क्यांवर येऊ शकतो.