दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेटने उडविला धुव्वा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ऑलराउंडर कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात ६ विकेट्सने धुव्वा उडवला. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान दिले होते. आरसीबीने हे आव्हान ४ विकेट्स गमावून आणि ९ बॉलआधी पूर्ण केले. आरसीबीने १८.३ ओव्हरमध्ये १६५ धावा केल्या. आरसीबीने यासह दिल्लीचा हिशोबही क्लिअर केला आणि पराभवाची परतफेड केली.
दिल्लीने आरसीबीला २४ मार्च रोजी ६ विकेट्सने पराभूत केले होते. आता आरसीबीने दिल्लीला जशास तसे उत्तर दिले. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सातवा विजय ठरला तर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला.
कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी आरसीबीच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. कृणाल याने अखेरपर्यंत नाबाद राहून आरसीबीला विजयी केले. कृणालने ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७३ धावा केल्या. कृणालसह टीम डेव्हिड १९ धावांवर नाबाद परतला. विराट कोहली याने या हंगामात अर्धशतकांची हॅट्ट्रिक केली. विराटने ४७ बॉलमध्ये ४ चौकारांसह ५१ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही खास करता आले नाही.
ओपनर जेकब बेथेल याने ६ बॉलमध्ये १२ रन्स केल्या. देवदत्त पडीक्कल याने घोर निराशा केली. देवदत्त याला भोपळाही फोडता आला नाही तर कर्णधार रजत पाटीदार याने ६ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मात्र, त्यानंतर कृणाल याने केलेल्या खेळीमुळे आरसीबाला कोणत्याही अडचणीशिवाय विजय मिळवता आला. या विजयामुळे आरसीबीने गुजरात टायटन्सला मागे टाकत १४ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. दिल्लीकडून कर्णधार अक्षर पटेल याने २ विकेट्स घेतल्या तर दुष्मंथा चमिरा याने १ विकेट घेतली.
त्याआधी आरसीबीने टॉस जिंकला. कर्णधार रजत पाटीदार याने दिल्लीला बॅटिंग दिली. दिल्लीने निर्धारित २० षटकांत ८ विकेट्स गमावून १६२ धावा केल्या. दिल्लीसाठी केएल राहुलने ४१, ट्रिस्टन स्टब्स याने ३४, अभिषेक पोरेल २८ आणि फाफ डु प्लेसीसने २२ धावांचे योगदान दिले. या चौघांव्यतिरिक्त एकालाही २० पार मजल मारता आली नाही.