जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यामध्ये यावर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक गावांमध्ये टँकर सुरू करण्यात आले होते. तसेच विहिर, बोअरचे अधीग्रहण देखील करण्यात आले होते. पाणीटंचाई विचारात घेऊन जळकोटच्या तहसीलदारांनी जवळपास सर्वच साठवण तलावावरील वीजपुरवठा खंडित केला होता. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस पडल्याने पिकांना जिवनदान मिळाले आहे. विशेषत: ऊस उत्पादक शेतक-यांना अवकाळी पाऊस पावला असून शिवारामध्ये ऊसाचे पिक हिरवागार दिसत आहे.
जळकोट तालुक्यातील साठवण तलावावरील वीजपुरवठा एप्रिल महिन्यामध्ये खंडित केल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या उसाला पाणी मिळणे अवघड होऊन बसले होते. शेतक-यांच्या विहिरीमध्ये देखील पाणी नव्हते. तसेच कुपनलिकेचे पाणी देखील कमी झाले होते. यामुळे जळकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचा ऊस पाण्याअभावी वाळून जात होता. यावर्षी ऊस टिकेल का नाही याची शाश्वती शेतक-यांना नव्हती.
परंतु ऊस उत्पादक शेतक-यांसाठी अवकाळी पाऊस आनंद घेऊन आला. जळकोट तालुक्यामध्ये दि. ११ ते २७ मे पर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये पाऊस झाला. तालुक्यामध्ये मे महिन्यात २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतशिवारामध्ये प्रचंड असा ओलावा झाला. विशेष म्हणजे वाळत असलेल्या ऊसाला देखील भरपूर पाऊस झाला. यामुळे जळकोट तालुक्यातील ऊसाचे मळे हिरवेगार झालेले आहेत. अगदी पावसाळ्यात जसा ऊस डोलतो तसा ऊस उन्हाळ्यामध्ये डोलत असताना दिसत आहे. शिवारामध्ये ऊस हिरवागार दिसत आहे. या अवकाळी पावसामुळे ऊस उत्पादक शेतक-यांची चिंता मिटली आहे.