मुंबई : प्रतिनिधी
देशात आणि राज्यात सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच अवघ्या ३ महिन्यांत साखरेच्या किमती तब्बल ४० टक्क्यांनी वाढल्याने किरकोळ बाजारात साखरेने ८० रुपये प्रति किलोचा टप्पा गाठला आहे. साखरेच्या या ऐतिहासिक दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र आक्षेप घेत यंदाचा साठा पाहता आगामी दिवाळीपर्यंत आणि पुढील हंगामात देशाला पुरेल इतके उत्पादन उपलब्ध असतानाही ही अचानक झालेली भाववाढ संशयास्पद असून यामागे मोठे ‘गौडबंगाल’ आहे, असा खळबळजनक दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला असून तीव्र आक्षेप घेत सरकार आणि कारखानदारांना आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे.
राज्यातील बाजारपेठेत सध्या साखर कडू झाली असून, ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. साखरेच्या दराने इतिहासातील सर्व उच्चांक मोडीत काढले असून, घाऊक बाजारात दर ७,५००रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. वाशिमसारख्या जिल्ह्यात साखर थेट ८० रुपये किलोवर विकली जात आहे.
दरवाढीचा नफा काळा पैसा वाल्यांच्या घशात
राजू शेट्टी यांनी साखरेच्या बाजारातील अंतर्गत साखळीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, साखरेचे भाव पुढील दोन महिन्यांत वाढवायचे आधीच निश्चित झाले होते. त्यामुळे मोठ्या व्यापा-यांनी मंदीच्या काळातच कमी दराने साखर खरेदी करून ती कारखान्यांच्या गोदामात साठवून ठेवली. आता बाजार कडाडल्यावर ‘आम्ही आधीच साखर विकली असून आमच्याकडे स्टॉक नाही,’ असा बनाव कारखानदार करत आहेत. रेकॉर्डवर नसलेली आणि उसाची रिकव्हरी चोरून तयार केलेली काळी साखर आता चढ्या दराने बाजारात आणली जात आहे. हा सर्व नफा प्रामाणिक शेतक-यांऐवजी काळा पैसा तयार करणा-या कारखानदार आणि व्यापा-यांच्या घशात जात आहे.
सरकारी आयातीवर प्रश्नचिन्ह
सरकारने बाजारातील दर नियंत्रणात आणण्यासाठी साखर आयात करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी तांत्रिक कारणांमुळे ऑक्टोबरच्या आत परदेशातून साखर भारतात येऊच शकत नाही, याकडेही शेट्टी यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे रेकॉर्डवरील शिल्लक साठा पुरेसा असताना ग्राहकांना लुटण्याचा हा प्रकार थांबवून सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
शुल्कमुक्त आयात आणि साठा मर्यादा
या गंभीर परिस्थितीची दखल घेत केंद्र सरकारने गुरुवारी तातडीने पावले उचलली आहेत. आता साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत १० लाख टन ‘रॉ शुगर’च्या शुल्कमुक्त आयातीला सरकारने मंजुरी दिली आहे. दरमहा १० टनांपेक्षा जास्त साखर वापरणा-या घाऊक ग्राहकांवर कडक निर्बंध लादण्यात आले असून, आता हे ग्राहक केवळ १५ दिवसांच्या वापराइतकीच साखर साठवून ठेवू शकणार आहेत.















