शिंदेसेनेत एन्ट्री, आता चौगुले यांच्या पराभवाची जखम झाली ताजी, मुलाने केली मागणी
उमरगा : खाजा मुजावर
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत धुसफूस हळूहळू समोर येऊ लागली आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमरगा-लोहारा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांचे अत्यंत लाडके असलेले, शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला. यासाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी जंग जंग पछाडले होते. आता ज्ञानराज चौगुले यांचे पुत्र शुभम चौगुले यांनी यावर बोट ठेवत खासदार राजेनिंबाळकर यांचे शिवसेनेत स्वागत आहे. तथापि, त्यांनी ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्यासह शिवसैनिकांची माफी मागावी, अशी मागणी शुभम यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे केली.
एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य होता, याची जाणीव आता उशिरा का होईना अनेकांना होत आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. ज्ञानराज चौगुले हे उमरगा-लोहारा मतदारसंघातून सलग तीनवेळा विजयी झाले होते. चौथ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. चौगुले हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. चौथ्यांदा विजयी झाले असते तर त्यांचे मंत्रिमंडळातील स्थान निश्चित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवखे उमेदवार प्रवीण स्वामी यांनी त्यांचा पराभव केला. चौगुले यांचा पराभव व्हावा, यासाठी खासदार राजेनिंबाळकर यांनी मोठा जोर लावला होता. पक्षनिष्ठेचे दाखले देत ही निवडणूक भावनिक पातळीवर नेली होती. त्यामुळे ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला. आता खासदार राजेनिंबाळकर यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे शुभम चौगुले यांनी त्याचा वचपा काढला. शिवसेनेत तुमचे स्वागत, मात्र उमरग्याला येऊन ज्ञानराज चौगुले, प्रा. रवींद्र गायकवाड आणि शिंसैनिकांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना हा केवळ पक्ष नसून एक विचार आणि भावनिक नाते असल्याचे नमूद करताना माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मराठवाड्यासह उमरगा-लोहारा भागात शिवसेनेची विचारधारा रुजवण्यासाठी मोठे योगदान दिेले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्ञानराज चौगुले यांनी सामाजिक बांधिलकी आणि विकासकामांना प्राधान्य दिल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमरगा-लोहारा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. मात्र या विकासकामांकडे दुर्लक्ष करून काहींनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही चौगुले यांनी केला. २०२४ च्या निवडणुकीत चौगुले यांच्याविरोधात चुकीचा प्रचार करण्यात आला. त्याबद्दलचा रोष आजही शिवसैनिकांमध्ये आहे. खासदार राजेनिंबाळकर यांना उमरगा-लोहारा मतदारसंघातील शिवसैनिक आणि जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करायचा असेल तर माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी पोस्टद्वारे केली.
संघर्ष जुनाच, आता फोडणी
असे सांगितले जाते, की ओमराजे निंबाळकर यांना २००९ मध्ये त्यावेळच्या उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळवून देण्यात माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांचा मोठा वाटा होता. २०१४ मध्ये प्रा. गायकवाड हे धाराशिवचे खासदार बनले. मात्र २०१९ मध्ये त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. यामागे खासदार राजेनिंबाळकर यांची खेळी होती, अशी चर्चा झाली होती. ही सल उमरगेकरांच्या मनात आजही आहे. त्यामुळे संघर्ष जुनाच आहे. त्याला नव्याने फोडणी दिली जात आहे.
तानाजी सावंत आणि
उमरग्याचे सख्य नाही
तानाजी सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री होते. असे असतानाही त्यांनी उमरग्याला एकदाही भेट दिली नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी ज्ञानराज चौगुले यांच्या मुलाच्या विवाह सोहळ््याला एकनाथ शिंदे यांनी उमरग्यात हजेरी लावली होती. त्यावेळीही सावंत आले नव्हते. प्रा. गायकवाड हे खासदार असताना उद्धव ठाकरे यांनी सावंत यांना संघटनात्मक पद देऊन धाराशिवला पाठवले. त्यानंतर प्रा. गायकवाड हळूहळू बाजूला होत गेले. त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहित आहे. ओमराजेंच्या शिंदेसेनेत प्रवेशासाठी सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, हे विशेष.
















