नांदेड : प्रतिनिधी
गोदावरी नदी पात्रात कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेसह सोबत असलेल्या २ मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुदैर्वी घटना उमरी तालुक्यातील भायेगाव येथे शनिवार दि. ७ जून रोजी दुपारी घडली. काही तासाच्या शोध मोहिमेनंतर स्थानिक नागरिकांनी तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले.
शनिवारी दुपारी १ च्या सुमारास गावातील महिला महानंदाबाई भगवान हनमंते वय ३४, पायल भगवान हनमंते वय १४ या माय लेकीसह एैश्वर्या मालु हणमंते वय १३ या तिघी कपडे धुण्यासाठी नदी पात्रात गेल्या होत्या. यावेळी पायल पाण्यात पाय घसरुन पडल्याने ती पाण्यात बुडत होती. तिला वाचविण्यासाठी आई महानंदा पाण्यात उतरली, या दोघींही माय लेकी पाण्यात बुडतांना पाहून सोबत असलेल्या एैश्वर्याने आरडाओरड करत पााण्यामध्ये उडी मारली. परंतू यातील कोणालाही पोहता येत नसल्याने तिघीही पाण्यात बुडाल्या. यावेळी उपस्थित महिलांनी आरडाओरड करून घटनेची माहिती अन्य नागरिकांना दिली.
काही वेळानंतर गावातील नागरीकांनी टोक-याच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह पाण्याबाहेर काढले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उमरीचे पोलिस निरीक्षक माने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. या दुर्देैवी घटनेमुळे भायेगावात हळहळ व्यक्त होत आहे. या तिघींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहेत. या घटनेबाबत उमरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया शनिवारी सायंकाळपर्यंत सुरु होती.

