27.8 C
Latur
Monday, June 2, 2025
Homeमहाराष्ट्रकांदा पुन्हा रडवणार?

कांदा पुन्हा रडवणार?

किमती गगनाला भिडणार   मुसळधार पावसाने उत्पादनाला फटका

मुंबई : प्रतिनिधी
मे महिन्यातच पावसाने अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. त्यामुळे हातातोंडाशी आलेली काही पिके हातची गेली. मुसळधार पावसाने कोट्यवधी रुपयांच्या कांद्याचे पीक खराब झाले. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतक-यांच्या संघटनेने नुकसानभरपाईची मागणी केली. शेतक-यांनी प्रति एकर १ लाख रुपये भरपाईची मागणी केली आहे. कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने आता कांद्याचा भाव वधारणार का, असा सवाल केला जात आहे.

राज्यातील कांदा उत्पादक संघटनेने भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाला, नाफेडने पारदर्शक कांदा खरेदीची मागणी केली आहे. याविषयीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. मे महिन्यात अभूतपूर्व पाऊस कोसळला. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, धाराशिव, परभणी, जालना, बुलडाणा, अकोला या जिल्ह्यांत कांदा उत्पादन घेण्यात येते. तिथे हा फटका बसला. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती व्यक्त होत आहे.

नुकसानभरपाईची मागणी
कांदा उत्पादकांनुसार, ज्या कांद्याची कापणी झाली होती, पण तो जमा करता आला नाही. तो कांदा खराब झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतक-यांनी प्रति क्विंटल २००० रुपये सबसिडी देण्याची मागणी केली आहे. कारण हा कांदा सडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच यातील जो माल चांगला आहे, त्याला सुद्धा कमी भाव मिळण्याची शक्यता आहे. शेतक-यांचा हजारो क्विंटल कांदा सडल्याचे आणि त्यांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतक-यांनी तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.

कांद्याच्या किमती वाढतील?
मुसळधार पावसात कांदा खराब झाल्याने येत्या काळात बाजारात कांद्याचा तुटवडा होऊन किंमत वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी पण पावसाने कांदा उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान केले होते. त्यामुळे किमती वधारल्या होत्या. कांद्याचे संकट दूर करण्यासाठी केंद्र सरकारला युद्धपातळीवर काम करावे लागले होते. अनेक शेतकरी या काळात मालामाल झाले होते. बफर स्टॉकसाठी आतापासूनच केंद्र सरकारने हालचाल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR