परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान तणाव निवळल्यानंतर आज पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने काश्मीरच्या मुद्यावर तिस-या व्यक्तीच्या हस्तक्षेपाची गरज नाही, असे म्हटले. काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय चर्चा होईल. पाकने भारताच्या जागेवर ताबा मिळवला आहे. पाकिस्तानने भारताची जागा खाली करावी, अशी आमची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही देशांत चर्चा सुरु आहे. यात तिस-या देशाची आवश्यकता नाही, असे म्हणत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेला ठणकावले.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तीन दिवसांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे, असे ट्विट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आणि त्याची माहिती दिल्याने देशभरात संतापाची लाट पसरली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भांडणात अमेरिकेच्या मध्यस्थीचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करीत या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा इन्कार केला. आज परराष्ट्र मंत्रालयानेही यासंबंधी खुलासा केला.
परराष्ट्र खात्याच्या वतीने आज प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषद घेऊन भारताची भूमिका मांडली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ संघटनेने स्वीकारली आहे. त्यामुळे, टीआरएफ संघटनेला दहशतवादी संघटनेच्या यादीत टाकावे, अशी मागणीही भारताने केली. पाकिस्तान अनेक वर्षांपासून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारताने इशारा देऊनही पाकिस्तानने ऐकले नाही, पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारतही प्रत्युत्तर देणार, असे परराष्ट्र मंत्रालयाने ठणकावून सांगितले. तसेच पाकिस्तानने अवैधपणे ताबा मिळवलेला काश्मीर खाली करावा लागेल, गेल्या अनेक वर्षांपासून भारताची हीच नीती असून ती कायम आहे, असेही जायस्वाल यांनी स्पष्ट केले.