लातूर : प्रतिनिधी
अनेकदा मुले विनाकारण अशा प्रक्रियेत ओढली जातात, त्यांना बालस्रेही वातावरण देऊन मार्गदर्शन व सहकार्य करणे गरजेचे आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांची जबाबदारी केवळ पालक किंवा शासनाची नसून संपूर्ण समाजाची आहे. यासाठी समाजातील सुजाण व प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी गावपातळीवरील पोलीस स्टेशनमध्ये बालस्रेही कार्यकर्ता म्हणून काम पहावे. मुलांनी चांगल्या मित्रांची संगत धरावी आणि शिक्षणाचे महत्त्व जाणावे. किरकोळ गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक प्रक्रियेवर भर देणे आवश्यक आसल्याचे मत जिल्हा न्यायाधीश तथा बाल न्याय मंडळाच्या प्रमुख आरती शिंदे यांनी व्यक्त केले.
अजीम प्रेमजी फाउंडेशनच्या सहकार्याने व टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कलापंढरी संस्थेमार्फत लातूर येथील बाल न्याय मंडळ आणि निरीक्षण गृहात विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी ‘मदत कक्षा’चे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश तथा बाल न्याय मंडळाच्या प्रमुख आरती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जावेद शेख, निरीक्षण गृहाचे अधीक्षक जोंधळे, बाल न्याय मंडळाच्या सदस्या छाया मलवाडे व छाया अकाते, बालकल्याण समितीच्या सदस्या स्वाती तोडकर, कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी. पी.सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शेख यांनी मदत कक्ष हा विधीसंघर्षग्रस्त बालकांसाठी बाल न्याय प्रणाली अधिक सुलभ व प्रभावी करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ पाच जिल्ह्यांमध्ये लातूरची निवड होणे ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, असे नमूद केले. कार्यक्रमाचे सुञसंचलन शिवदर्शन सदाकाळे यांनी तर आभार बाल निरीक्षण गृहाचे अधीक्षक जोंधळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलापंढरी संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक शिवदर्शन सदाकाळे, जयवंत जंगापल्ले, धनराज पवार, अक्षता सूर्यवंशी. अॅड. सुनेना बायस, मंगल मगर, गावपातळीवरील सर्व समुदाय संघटकांनी परिश्रम घेतले.