मुंबई : प्रतिनिधी
लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरपवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि राजस्थाननंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील या कफ सिरपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने सूचना दिल्याप्रमाणे राज्याच्या आरोग्य विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीने चुकीची औषधांचा फटका लहान मुलांना बसला त्याबद्दल केंद्र सरकारने जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
केंद्रीय अन्न व औषध प्रशासन कोल्ड्रिफ कफ सिरपबाबत योग्य ते निर्देश देत आहे. एखाद्या कंपनीचे एखादे औषध चुकीचे असेल म्हणजे सर्व काही चुकीचे आहे, अशा स्पष्ट सूचना आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत आहे. केंद्र सरकारकडून याबाबत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक झाली. केंद्र सरकारकडून मिळालेल्या सूचनांचे आम्ही पालन करत आहोत. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, अशी भूमिका मंत्री प्रकाश आबिटकर यांनी मांडली.
कोल्हापूरचा थोरला दवाखाना अशी ओळख असलेल्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अर्थात सीपीआरमध्ये मनुष्यबळाची वानवा आहे. आरोग्य कर्मचारी कमी असल्यामुळे याचा फटका उपचारासाठी येणा-या रुग्णांना बसत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, ‘सीपीआर सुरू झाल्यानंतरची लोकसंख्या आणि आताची परिस्थिती वेगळी आहे, जोपर्यंत शेंडा पार्कातील हॉस्पिटल सुरू होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना याचा त्रास होईल.’
दरम्यान, शेंडा पार्कातील हॉस्पिटल आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये १५० बेड वाढवण्याचे नियोजन आहे. जोपर्यंत या सुविधा होत नाहीत तोपर्यंत नागरिकांची अडचण होते, याची आम्हालाही कल्पना आहे. मात्र, याबाबत सीपीआरमध्ये प्राधान्य क्रमांक देण्याच्या सूचना डीनना देण्यात आल्या आहेत.