22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरखरिपाचा पीकविमा: कंपनीकडून शेतक-यांची चेष्टा 

खरिपाचा पीकविमा: कंपनीकडून शेतक-यांची चेष्टा 

लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात गतवर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली होती. सोयाबीन पीक फुलो-यात असताना पावसाने उघडीप दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली होती. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतक-यांना बसला. पीकविमा कंपनीकडून काही शेतक-यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरीत रक्कम गावोगावी मोजक्याच शेतक-यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या मोबाईलवर कधी मेसेज पडणार, याकडे लक्ष लावून असले आहेत.
खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतक-यांनी सोयाबीनचा पीकविमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलो-यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नूकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोगसुद्ध केले.
जिल्हाधिकारी स्वत: हजर राहून पीक कापणी प्रात्यक्षिक करुन घेतले. तो अहवाल कृषी खाते, महसूल खाते व संबंधीत पीकविमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष पैसेवारीसाठी  सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पीकविमा कंपनीने शेतक-यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतक-यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन, अशा शेतक-यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली  आहे.  पीकविमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधा-याच्या बाजूच्या शेतक-याला विमा आला. एका भावाला विमा आला आणि एका भावाला पंघरा दिवसांपासून नुसतीच वाट पहावी लागत आहे. मोबाईलवर मेसेज आला की, पीकविम्याचाच असावा, असा समज करुन पाहत आहे असे प्रकार गावोगावी घडत आहेत.
या संदर्भात जिल्हाधिका-यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतक-यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतक-यांच्या खात्यावर पीकविमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगीतले. शेतक-यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR