ओमराजे वाघाची कातडी पांगरलेला लांडगा निघाला, ठाकरेंचा हल्लाबोल
धाराशिवमध्ये संवाद मेळावा
धाराशिव : प्रतिनिधी
खासदार फुटीच्या चर्चेवेळी सर्व खासदारांची आपण बैठक बोलावली. त्यावेळी ओमराजे मुलगा आजारी असल्याचे कारण सांगत गैरहजर राहिले. त्याचवेळी आपल्या मनात शंका निर्माण झाली. तरीही आपण त्याच्यासाठी शेवटपर्यंत फोन केला. यासाठी त्यांना आ. कैलासलाही भेटायला पाठवले. परंतु हा तर वाघाचे कातडी पांखरलेला लांडगा निघाला. आता तुमच्या उरावर भगवा फडकविल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी खासदार ओमराजे यांच्यावर केला. तसेच यावेळी त्यांनी सरकारवही जोरदार टीका केली.
धाराशिव येथे रविवारी (दि. २८) पदाधिका-यांशी संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खा. अनिल देसाई, आ. अंबादास दानवे, कैलास पाटील, आ. प्रवीण स्वामी, शंकराव बोरकर, सुनिल काटमोरे, मकरंद राजेनिंबाळकर, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती. ठाकरे पुढे म्हणाले की, कालपासून महाराष्ट्राच्या दौ-यावर फिरत असताना आज चित्र वेगळे दिसत आहे. त्यामुळे आता तुमचे नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. या सभा नसून कौटुंबिक बैठका आहेत. आता भगवा तुमच्या उरावर फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही.
मागच्या २०२२ च्या गद्दारीवेळी आ. कैलासच्याही पायी संपत्तीची रास पडली होती. तरीदेखील त्याने ते सगळे लाथाडून शिवसेनेशी इमान राखत शिवसैनिक कसा असावा, हे दाखवून दिले. गाड्यांमधून आमदार घेऊन जात होते, त्यावेळी कैलासने मला फोन करून या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा कैलास सुरतच्या बॉर्डरवरून गाडीतून उडी टाकून पायी चालत आला. तेव्हाही कैलासच्या पायाशी संपत्तीची रास व खोक्यांचे आमिष होतेच. पण ते सगळेच त्याने लाथडले, हाच खरा शिवसैनिक आहे.
सरकारकडे बहुमत असतानासुद्धा यांनी आमदार फोडले, पक्ष-चिन्ह घेतले. तरीदेखील नवीन चिन्ह घेवून आपण तुमच्या मदतीने उभारलो. यांना महाराष्ट्र संपवण्यासाठी शिवसेना फोडायची आहे. ठाकरे संपावायचे आहेत. महाराष्ट्रातील उद्योग-धंदे गुजरातला न्यायचे आहेत. आज या ठिकाणी एकही उद्योग आणला नाही, अशी टीका करतानाच तुमच्या कितीही पिढ्या संपल्या तरी शिवसेना संपणार नाही, असे ठाकरे म्हणाले. शिवसैनिक हिच आमची संपत्ती आहे. जोपर्यंत तुम्ही आहेत. तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. या गद्दारानी सरकार पाडले नसते तर आपण कर्जमुक्ती केली असती, असेही ते म्हणाले.
यापूर्वी आमदार फोडले, आता खासदार फोडले आणि म्हणाले शिवसेना संपली. उध्दव ठाकरे यांना पक्ष चालवता येत नाही. मग तिकडे ममतांचा पक्ष, आम आदमी पक्ष का फोडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. हे राजकारण देशासाठी घातक असून हे सर्व पंतप्रधानांच्या खुर्चीसाठी चालू असल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
गद्दारी न करण्याची
ग्वाही देऊन पळाला
ओमराजे माझ्या शेतक-यांच्या कष्टाच्या पैश्यावर निवडून आला. पुढे पैश्याचा पाऊस सुरू असताना शेतक-यांनी त्यास निवडून आणले. यावेळी त्याने माझ्या सभेत गद्दारी करणार नसल्याची उदाहरणेही दिली. मात्र, त्यानेच आता गद्दारी केली. स्वत:चे पाप झाकण्यासाठी तो तिकडे गेला. याचे आधी प्रकरण कळाले असते तर त्यास संधी दिली नसती. परंतु ती माझी चूक झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यात शेतक-यांचे
वाटोळे करणारे सरकार
राज्यात सध्या अंदाधुंदी माजली आहे. आपले सरकार असताना आपण कर्जमुक्ती दिली होती. मात्र आता गुन्हेगारांना माफी देण्यात येते. त्याप्रमाणे कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले. मात्र, कर्जमाफी नाही. पीककर्ज नाही, हमीभाव नाही, हे सरकार शेतक-यांचे वाटोळे करणारे सरकार आहे आणि हे गद्दार या सरकारकडे गेले आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी गेले आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला. आता हे चार्टर्ड विमानाने फिरत आहेत. त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस
यांची खुर्चीही धोक्यात
आज जे गद्दार गुलाम सेनेत गेले त्यांचे भवितव्य आहे का, कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांची खुर्र्ची गेली तर नवल वाटायला नको. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान हे लोकप्रिय होते. ते भविष्यात पंतप्रधान होतील, या भीतीपोटी त्यांना कुठे पाठवले, तशीच परिस्थिती महाराष्ट्रातील भाजपा नेते नितीन गडकरी यांची केली. आता देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी या गद्दारांना पुढे केले जात आहे. त्यामुळे खासदारांना फोडल्याची त्यांची चिंता वाढली आहे.
















