32.2 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeराष्ट्रीयगोध्रा हत्याकांड ही एक अकल्पनीय शोकांतिका

गोध्रा हत्याकांड ही एक अकल्पनीय शोकांतिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच बोलले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गोध्रा हत्याकांडांची घटना ही अकल्पनीय शोकांतिका असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. त्यावेळी केंद्रात विरोधी पक्षाचे सरकार होते. त्यांनी खोट्या खटल्यांमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांचे प्रयत्न असूनही न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केले. तसेच आरोपींना शिक्षा झाली असल्याचे मोदी म्हणाले.

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली, ती रविवारी प्रसारित करण्यात आली. ३ तासांच्या या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी त्यांच्या जीवनातील अनेक अनुभव सांगितले. तसेच गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या दंगलीबाबत त्यांनी प्रथमच जाहीरपणे भूमिका मांडली. याबाबत त्यांनी गुजरात दंगलीपूर्वीच्या घटना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे म्हटले.

२४ डिसेंबर १९९९ रोजी काठमांडू ते दिल्लीला जाणारे विमान अपहरण करून कंदहारला नेण्यात आले. २००० मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्यावर दहशतवादी हल्ला झाला. ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला. ऑक्टोबर २००१ मध्ये जम्मू-काश्मीर विधानसभेवर दहशतवादी हल्ला झाला. १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला झाला. हे सर्व जागतिक स्तरावरील दहशतवादी हल्ले होते, ज्याने जागतिक अस्थिरतेची ठिणगी पेटवल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार १९६९ ची दंगल ६ महिने चालली होती. त्यावेळी विरोधी पक्ष सत्तेत होता आणि त्यांनी आमच्यावरच्या या खोट्या केसेसमध्ये आम्हाला शिक्षा व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना न जुमानता न्यायव्यवस्थेने संपूर्ण घटनेचे तपशीलवार विश्लेषण केल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आरोपींना शिक्षा झाली आहे. २००२ पूर्वी गुजरातमध्ये सातत्याने दंगली होत होत्या. मात्र २००२ नंतर कोणतीही मोठी घटना घडली नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

गुजरातमधील गोध्रा स्टेशनवर २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या बोगीला आग लावण्यात आली होती. अयोध्येहून परतणा-या ५९ कारसेवकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगली उसळल्या. साबरमती ट्रेनच्या एस-६ या बोगीला आग लावल्याप्रकरणी एसआयटीच्या विशेष न्यायालयाने ३१ जणांना दोषी ठरवले होते तर ६३ जणांना निर्दोष मुक्त केले. आरोपींपैकी ११ जणांना फाशी तर २२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. कोर्टाच्या या निर्णयाला गुजरात हायकोर्टात आव्हान देण्यात आले होते.

२००२ पूर्वी गुजरातमध्ये
२५० पेक्षा जास्त दंगली
मी ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचा मुख्यमंत्री होणार होतो. २४ फेब्रुवारी २००२ ला मी पहिल्यांदा आमदार झालो. माझे सरकार २७ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार होते, तेव्हा आम्हाला गोध्रा रेल्वे दुर्घटनेची माहिती मिळाली. ही अत्यंत गंभीर घटना होती. लोकांना जिवंत जाळण्यात आले होते. आधीच्या सगळ््या घटनांनंतर परिस्थिती कशी असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. २००२ पूर्वी गुजरातमध्ये २५० हून अधिक मोठ्या दंगली झाल्या होत्या, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR