मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षांत नाबार्ड, आयडीबीआय, नॅशनल हाऊसिंग बँक सारख्या संस्थांची स्थापना करून आर्थिक परिसंस्था मजबूत केली. आरबीआयने शेती, लघू व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रालाही आवश्यक आधार दिला. असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (दि.१ एप्रिल) मुंबईत बोलताना केले. त्यांच्या उपस्थितीत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्षपूर्ती सोहळ्याचा समारोप कार्यक्रम झाला. त्यावेळी राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या.
देशाच्या डिजीटल पेमेंट पायाभूत सुविधांचे सातत्याने आधुनिकीकरण करून, डिजिटल पेमेंटमध्ये भारताला जागतिक स्तरावर आघाडी घेण्यासाठी आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली. आरबीआयने एक चैतन्यपूर्ण अशी फिनटेक इकोसिस्टमदेखील विकसित केली. गेल्या ९० वर्षांतील आरबीआयचा उल्लेखनीय प्रवास सरकारचे व्हिजन आणि धोरणांशी सुसंगत असा राहिला आहे. भारत स्वातंत्र्याची शताब्दी जवळ येत असताना, विकसित भारत २०४७ चे ध्येय साध्य करण्यासाठी अशा एका आर्थिक परिसंस्थेची आवश्यकता आहे जी नाविन्यपूर्ण, अनुकूल आणि सर्वांसाठी सुलभ असेल, असे मुर्मू म्हणाल्या.
पुढील दशक आपल्या अर्थव्यवस्थेच्या आर्थिक संरचनेला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल. भारतातील जनतेने रिझर्व्ह बँकेवर दाखवलेला विश्वास ही आमच्यासाठी सर्वात मोठी संपत्ती आहे. आम्ही हा विश्वास पुढील काळात जपण्यासाठी आणि आणखी मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहेत, असे आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले.