बारामती : प्रतिनिधी
रविवारी (दि. २५) बारामती शहर आणि परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत बारामतीत पोहोचले. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून पंचनामे सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बारामती परिसरात अतिवृष्टीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पिंपळी परिसरात नीरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दिवसांत गुरुवारी दुसरा पाहणी दौरा करीत नुकसानीची माहिती घेतली.
सोमवारी (दि. २६) दिवसभर पवार यांनी बारामती शहर, तालुक्यासह इंदापूर तालुक्याचा पाहणी दौरा करीत नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवारी (दि. २९) पाहणी दौरा केला.. बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिका-यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतक-यांसमवेत संवाद साधला.
यावेळी पवार यांनी, पंचनामे उरकले का? धान्य देण्यास सुरुवात झाली आहे, धान्य मिळाले का? असा सवाल करीत शासनाच्या उपाययोजनांबाबत माहिती देत शेतक-यांना आश्वस्त केले. पवार म्हणाले, ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे, त्यांना दहा हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.