राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्याच्या दुस-याच दिवशी रविवारी लोकसभा आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. सध्याची परिस्थिती, ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम दहशतवादी हल्ला यावर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवावे, असे पत्रात म्हटले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीर केलेला शस्त्रविराम यावर चर्चा करणे हे लोकांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यासमोर येणा-य आव्हानांना तोंड देण्यासाठीचा आपला सामूहिक निर्धार दाखवून देण्याची ही एक संधी असेल. त्यामुळे तात्काळ विशेष अधिवेशन बोलवावे, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधान मोदी यांना वेगळे पत्र लिहिले असून, राहुल गांधी यांच्या मागणीला या पत्रातून पाठिंबा दर्शवला असून, सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या निर्णयांना अधिकृतपणे पूर्ण पाठइंबा जाहीर केला होता. परंतु भारत-पाकिस्तान यांच्यातील चर्चेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या मुद्यावर आता कॉंग्रेसकडून सरकारला घेरले जाऊ शकते. भारत-पाकिस्तानमधील वाटाघाटींत कोणत्याही तिस-या पक्षाचा हस्तक्षेप होणार नाही, याची सरकारने काळजी घेतली. मग ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा कशी केली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.