जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील चिंचोली येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लातूर डी. बी. जाधव यांनी विविध कृषी योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी करून शेतक-यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील विविध समस्यांची माहिती घेत शेतक-यांना मार्गदर्शन केले.
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण उप-अभियानांतर्गत ट्रॅक्टर, पलटी नांगर व इतर शेती अवजारांची पाहणी करण्यात आली तसेच राष्ट्रीय खाद्यतेल व गळीत धान्य अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या सोयाबीन पीक प्रात्यक्षिकालाही भेट देऊन पीकस्थितीची पाहणी करण्यात आली. जाधव यांनी शेतक-यांशी संवाद साधताना सोयाबीन पिकातील रोग व किडींचे व्यवस्थापन, योग्य औषध फवारणी, दर्जेदार बियाण्यांची निवड, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक पात्र शेतक-यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या मार्गदर्शनामुळे उपस्थित शेतक-यांनी समाधान व्यक्त करीत कृषी विभागाच्या पुढाकाराचे स्वागत केले आणि अधिका-यांचे आभार मानले. या पाहणीवेळी उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर श्रेयश यादव, तालुका कृषी अधिकारी एस. आर. पाटील, उपकृषी अधिकारी गीते, धुपे, सहाय्यक कृषी अधिकारी संदीप पाटील, उमेश सूर्यवंशी, नारायण तौर, सुधाकर कांबळे, रोहित जनकेवाड तसेच शेतकरी निवृत्ती बट्टेवाड, संतोष बट्टेवाड, सुरेश गव्हाणे, सुभाष बोडेवार, सतीश वाघमारे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
















