24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रचुकीचे काम करतो, तोच माफी मागतो

चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो

पंतप्रधान मोदींवर राहुल गांधींचा घणाघात राज्यातील संपूर्ण जनतेची माफी मागायला हवी

सांगली : प्रतिनिधी
आपल्या हातून चूक होते, तेव्हाच माफी मागितली जाते. ज्याने चुकीचे कृत्य केलेले नाही, तो माफी मागतच नाही. मग शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली असेल, तर त्यांना चूक झाल्याचे मान्य आहे का, , अशी विचारणा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. यांनी शिवरायांचा अपमान केला असून पंतप्रधान मोदींनी थेट महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेची माफी मागायला हवी, असे राहुल गांधी म्हणाले.

सांगलीत आज राज्याचे माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ््याचे लोकार्पण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या विराट सभेत राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींसह भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यानंतर राज्यात संतप्त वातावरण आहे. हाच मुद्दा पकडत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली? त्यामागे तीन कारणे असू शकतात. यात मूर्तीचे काम आरएसएसच्या माणसाला दिले गेले होते ते द्यायला नको होते. ते काम मेरिटवर द्यायला हवे होते. दुसरे कारण म्हणजे मूर्तीच्या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा चोरी झाली असेल, त्यासाठी कदाचित मोदी यांनी माफी मागितली असावी. तिसरे कारण शिवाजी महाराजांची मूर्ती केली, पण ती मूर्ती उभी राहू शकली नाही. मात्र, या ठिकाणी पतंगराव कदम यांची जी मूर्ती उभी केली गेली, ती तुम्ही ५०-६० वर्षांनी जरी पाहिली तर ती तुम्हाला दिसेल. मात्र, शिवरायांच्या पुतळ््यामध्ये कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केल्याने मोदी यांनी माफी मागितली असावी, अशी कारणे देत राहुल गांधी यांनी मोदींच्या माफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या आठवणी जागवताना राहुल गांधी म्हणाले की, पतंगराव कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्र, देशासाठी दिले. शेवटपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. इंदिरा गांधी निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ते सोबत राहिले होते. मध्यरात्री सभा घेतली होती. महाराष्ट्र विकसित राज्य असून राज्याच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. या राज्याला शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर यांनी प्रेरणा दिली असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

नोटबंदी, जीएसटीबद्दलही माफी मागायला हवी
केंद्रातील मोदी सरकार केवळ दोन लोकांसाठी चालवत असल्याचा घणाघातही राहुल गांधी यांनी केला. नोटबंदी चुकीच्या पद्धतीने झाली. जीएसटीची ज्या पद्धतीने अंमलबजावणी झाली, त्याचीसुद्धा माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

आमची विचारधारा, शिवाजी महाराजांची विचारधारा एकच
आमची विचारधारा आणि शिवाजी महाराजांची विचारधारा एकच आहे. आमच्या डीएनएमध्येच ही विचारधारा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विचारधारेविरुद्ध युद्ध असून एका बाजूला महापुरुष आहेत आणि दुस-या बाजूला भाजप असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मागास लोकांना मागास ठेवण्याचाच प्रयत्न सुरू असून, भाजपकडून जाती-धर्म, भाषांमध्ये लढवले जात आहे, असेही ते म्हणाले.

मविआची सत्ता आल्यास दरमहा २ हजार देणार
राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चलती असून राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्­यांकडून जोमाने या योजनेच्या अनुषंगाने प्रचार व प्रसार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यात आमचे सरकार आल्यास आम्ही लाडक्या बहि­णींना दोन हजार रुपये महिन्याला देऊ, असे आश्वासन दिले आणि तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहात का, मोदी सरकारने तोडण्या फोडण्या पलिकडे काय केल ते सांगा, असा सवाल खरगे यांनी उपस्थित केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR