रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद संपादन केल्यावर बुधवारी बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित केलेल्या सत्कार समारंभादरम्यान चेंगराचेंगरी झाली अन् ११ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंगराचेंगरी प्रकरणी कर्नाटक सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर केला. आता या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाणार आहे. तसेच विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येईल, असे कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्या. सी. एम. जोशी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला अपघाताचा स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले. पुढील सुनावणी १० जून रोजी होईल. आरसीबीच्या खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय कोणी घेतला, हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. देशासाठी न खेळणा-या खेळाडूंचा सन्मान करण्याची काय गरज होती? असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात केला. तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर विजयोत्सव करताना झालेल्या चेंगराचेंगरीत मृत झालेल्या ११ जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत आरसीबीने जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी म्हणून ‘आरसीबी केअर्स’ नावाचा मदतनिधी देखील उभारला जात आहे. आरसीबीच्या विजयोत्सवात चेंगराचेंगरी प्रकरणी बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाने हात झटकले आहेत.
आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल म्हणाले, चेंगराचेंगरीची घटना कळताच आम्ही ताबडतोब आयोजकांना कार्यक्रम लवकर संपवण्याची विनंती केली. या घटनेला बीसीसीआय जबाबदार नाही. ही खरोखरच अतिशय दु:खद घटना असून आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. बीसीसीआयसाठी आयपीएल अंतिम सामन्यानंतरच संपुष्टात आले. आम्हाला अशा कोणत्याही घटनेची कोणतीही माहिती नव्हती. मग त्यासाठी आम्हाला कसे जबाबदार धरता येईल? चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर घडलेली चेंगराचेंगरी हा केवळ एक अपघात नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचे लक्षण आहे. मृत्युमुखी पडलेल्या परिवारामध्ये एका १३ वर्षांच्या चिमुरड्या मुलीचाही समावेश आहे. हे सारे पाहताना खूप वेदना होतात. या घटनेने आपल्याला एक मोठा धडा दिला आहे. कोणतीही भावना ही विवेकशून्य झाल्यास, ती विनाश घडवू शकते. उत्साह असावा पण त्याचबरोबर शहाणपणही असावे. कारण ज्या चिन्नास्वामी स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ३५ हजार आहे तिथे जर दीड-दोन लाख लोक जमा होत असतील तर प्रशासन व सुरक्षा यंत्रणा काही करू शकत नाही. आपणही निरपराध नाही.
‘संधी चुकवायची नाही’ या मानसिकतेमुळे शिस्त मोडली जाते. अफवा, गोंधळ, ढकलाढकली हे सगळं चक्र आपणच सुरू करत असतो. सामान्य माणूसही संयम बाळगू शकत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मुळात, अशा गर्दीत जायची काय गरज होती? चेंगराचेंगरी होऊ शकते हे माहीत असताना लोक गर्दीत घुसतात ही आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. आपला जीव ही आपलीच जबाबदारी असते. गेलेले प्राण परत मिळत नाहीत. त्यामुळे अशा दुर्दैवी घटनेनंतर आगामी काळात तरी सर्वसामान्य लोक त्यापासून काही बोध घेतील ही अपेक्षा. व्याधी, दु:ख, मरण या घटना मानवाधीन नसल्या तरी विवेकबुद्धीचा वापर करणे नक्कीच मानवाधीन आहे. विजयी संघाचे स्वागत झाले पाहिजे यात वाद नाही पण आनंद साजरा करण्यासाठी आपले ‘असणे’ महत्त्वाचे आहे. आनंदाचा उत्सव साजरा करताना समोर दिसणारे संकट ओळखून उत्साहाला काबूत ठेवले तर आपल्या मौल्यवान जीवाचे रक्षण होईल. विजयोत्सव साजरा करताना चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू होणे ही घटना अत्यंत क्लेशदायक आहे.
मुळात आयपीएलमध्ये खेळणारे संघ त्या-त्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात का? कारण आयपीएलमध्ये संघमालक आपली आर्थिक गुंतवणूक करतात, विविध देशांचे खेळाडू लिलावात विकत घेतात. त्यांचा आयपीएलच्या माध्यमातून नफा कमावणे हा उद्देश असतो. खेळाडूंना जरी आर्थिक लाभ होत असला तरी अंतिमत: मालामाल हा संघमालकच होत असतो. क्रिकेट कसोटी मालिका, विश्वकप, टी-२० चषक स्पर्धेत खेळताना खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये मिळालेल्या विजयाचा आनंद क्रिकेटप्रेमींसाठी नव्हे तर देशासाठीही अभिमानाचा क्षण असतो. या उलट आयपीएलकडे फक्त मनोरंजन म्हणून चाहते पाहतात. म्हणून आयपीएलमध्ये होणा-या आर्थिक उलाढालीकडे चाहत्यांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. तसेच विजयोत्सव साजरा करताना चाहत्यांनी संयम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. तसे झाले तरच अशा अप्रिय घटनांना पायबंद बसू शकेल. अशा दुर्घटनेमुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा ती आपत्ती ठरू शकते. धार्मिक, राजकीय, सामाजिक कारणांमुळे गर्दीची निर्मिती होते. सण-उत्सव, जत्रा ही सुद्धा गर्दीची ठिकाणे आहेत. गर्दीला शिस्त नसते त्यामुळे गोंधळ होतो.
लोकांच्या उत्साहाचा अतिरेक होतो तेव्हा परिस्थिती बिकट बनते. मुंबई शहराने विजयोत्सवाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत, तुफान गर्दीचा अनुभव घेतला आहे. परंतु या गर्दीने कधीही अप्रिय घटनेचे गालबोट लागू दिले नाही. मुंबई पोलिसांनी आधीपासूनच केलेले नियोजन महत्त्वाचे ठरले. पोलिस, इतर अधिकारी, क्रिकेट बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटच्या समन्वयाने सारे काही सुरळीत पार पडले. मुंबई पोलिसांनी बंगळुरूपेक्षा दहापट जास्त गर्दी हाताळली परंतु एकही दुर्घटना घडू दिली नाही. २०२४ मध्ये टी-२० विश्वकप विजेत्या भारतीय संघाचा विजयोत्सव साजरा झाला तेव्हा मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त कौतुकास्पद होता. भारतीय संघानेसुद्धा पोलिसांचे आभार मानले होते. भारतीय संघाची विजयी यात्रा यशस्वी करण्यासाठी ८०० हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संघाच्या बसभोवती १०० पोलिसांचे कडे होते आणि प्रत्येक चौकात १०० हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय सुरक्षा दलाचे जवानही बंदोबस्तासाठी होते. वानखेडे स्टेडियममध्येही बंदोबस्त होता. देशातील राज्यांनी मुंबई पोलिसांच्या व्यवस्थापनाचे अनुकरण करायला हवे.