नारायणपूर : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमदमध्ये आज सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. जिल्हा राखीव गटाच्या (डीआरजी) जवानांसोबत झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले असून, या चकमकीत एक डीआरजी जवानही जखमी झाला आहे. जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. याशिवाय नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात आहे.
नारायणपूरचे पोलिस अधीक्षक (एसपी) प्रभात कुमार यांनी सांगितले की, अबुझमदमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या मोहिमेत नारायणपूर-कोंडागाव-कांकेर-दंतेवाडा डीआरजी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) च्या ५३ व्या बटालियनचा समावेश आहे. आतापर्यंत ८ नक्षलवादी ठार झाले असून चकमकीसह इतर ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊ शकते असे पोलिस अधीक्षकांनी म्हटले.
छत्तीसगडमध्ये यावर्षी १३५ हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा
७ जून रोजीही नारायणपूर-दंतेवाडा येथे नक्षलवादी आणि डीआरजी जवानांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये ७ गणवेशधारी नक्षलवादी ठार झाले. याशिवाय ३ जवानही जखमी झाले होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी जंगलात आयईडी स्फोटात दोन आयटीबीपी जवान जखमी झाले. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार, यावर्षी राज्यात आतापर्यंत १३६ नक्षलवादी मारले गेले आहेत, ५०३ जणांना अटक करण्यात आली आहे. तर ४३७ जणांनी आत्मसमर्पण केले आहे.