बीजापूर : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील बीजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, चकमकीत १२ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल नक्षलवाद्यांवर सातत्याने कारवाई करीत आहे. बीजापूरच्या फरसेगड पोलिस ठाण्याजवळील नॅशनल पार्क परिसरात महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर सकाळपासून ही चकमक सुरू आहे. या चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
सकाळी ८ वाजल्यापासून डीआरजी बीजापूर, एसटीएफ, सी-६० जवान अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत सुमारे १२ नक्षलवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. या चकमकीत राज्य पोलिसांच्या जिल्हा राखीव रक्षक दलातील एक आणि विशेष कार्य दलातील एक असे दोन सुरक्षा कर्मचारीही ठार झाले आणि इतर दोघे जखमी झाले, असे अधिका-यांनी सांगितले. मृत सुरक्षा कर्मचा-यांचे मृतदेह ताब्यात घेण्याबरोबरच जखमी जवानांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले.
संयुक्त सुरक्षा दलाला पाचारण
राष्ट्रीय उद्यान परिसरात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर संयुक्त सुरक्षा दलांना रवाना करण्यात आले. राष्ट्रीय उद्यान परिसरात जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. एएसपी चंद्रकांत गोवर्णा म्हणाले की, सकाळपासून चकमक सुरू आहे. अनेक नक्षलवादी मारले गेले असण्याची शक्यता आहे. घटनेच्या ठिकाणी नक्षलवाद्यांचे मृतदेह दिसले आहेत.