लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त १३ एप्रिल रोजी लातूर जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित जय भीम पदयात्रेला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या यात्रेत सहभागी होवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचे विचार नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावरून उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ आणि उपविभागीय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे यांच्या हस्ते झेंडी दाखवून पदयात्रेला सुरूवात झाली.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, मधुकर ढमाले, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, प्रा. संदीप जगदाळे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक समतेचा संदेश देणारे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी जय भीम पदयात्रा महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांनी व्यक्त केला. तसेच पदयात्रेत सहभागी झालेल्या सर्वांना त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
दयानंद महाविद्यालय मैदान येथून सुरू झालेली जय भीम पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी न-हे म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश दिला. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करावा, तसेच समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत हा संदेश पोहचवला जावा.
प्रारंभी शाहीर धम्मपाल सावंत यांच्या पथकाने भीम गीतांमधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडले. या गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद दिला. एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र, भारत स्काऊट अँड गाईडसह विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी यांचा या
पदयात्रेमध्ये सहभाग नोंदविला.