लातूर : प्रतिनिधी
मान्सूनपूर्व पावसाने लातूर शहर आणि जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरात नाल्याचे पाणी घरात घुसले रस्ते वाहून गेले आहेत. ग्रामीण भागात फळबागा, भाजीपाला अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करावेत, ८-अ व इतर कागदपत्राची अट शिथील करुन आपातग्रस्तांना तातडीने मदत वाटप करावी. या संदर्भाने १५ दिवसांची स्वच्छता, दुरुस्ती विशेष मोहीम राबवून आगामी काळात नागरिकांना त्रास होऊ नये याची पूर्वतयारी करावी, यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी दि. २८ मे रोजी आयोजीत केलेल्या दुरदृश्यप्रणालीव्दारे आयोजीत बैठकी दरम्यान केली आहेत.
लातूर जिल्ह्यात बुधवारी झालेल्या अतीवृष्टीच्या धर्तीवर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी व वरीष्ठ अधिका-या समवेत दुरदृश्यप्रणालीव्दारे आढावा बैठक घेतली. या प्रसंगी बोलतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर शहरातील, रस्त्यांना नद्यांच्या स्वरुप आल्याची परिस्थिती सर्वांनीच पाहिली आहे. त्यामुळे पाणी ओसरल्यानंतर लगेच व्यापक स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, नाले साफसफाई व रस्ते दुरुस्ती करून घ्यावेत. लातूर महापालिका आयुक्त पदावर सध्या प्रभारी अधिकारी आहेत तेथे सक्षम पूर्णवेळ अधिका-यांची तातडीने नियुक्ती करावी. महापालिकेत मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचा-यांची रिक्त पदे आहेत, लोकसंख्येच्या प्रमाणात ही पदे भरलेली नसल्यामुळे, स्वच्छता व आरोग्य सारख्या महत्त्वाच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगीतले.
लातूर शहरात मागचे अनेक दिवस पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत राहिल. पालकमंत्री व इतर सर्वच पातळावरुन सांगूनही त्यात सुधारणा झाली नाही. तेथे अनेक वर्ष असलेल्या अधिकारी, कर्मचा-यामुळे या कामात सुधारणा होत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. शहरात ड्रेनेज व ईटीपी प्लांटची अर्धवट कामे झालेली आहेत ही कामे त्वरित पूर्ण करावीत. शहरातील घाण पाणी नियोजित पद्धतीने बाहेर न्यावे. स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विचार करून मागच्या कत्तल खाण्याचा विषय मार्गी लावावा, असे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
लातूर शहरात व जिल्ह्यात या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, यासाठी ८अ व इतर कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट शितल करावी, कॅनॉल, बॅरेजेस तसेच, इतर सिंचन प्रकल्पाची मान्सून पूर्व मेंटनची कामे झाली नसतील तर ती त्वरित करून सूचना कराव्यात आदी मागण्या या बैठकीदरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी नोंदवल्या आहेत. पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी, या सर्व सूचनांचा आपल्या मनोगतात उल्लेख करून त्या तातडीने पूर्णत्वास नेण्यासंदर्भात सूचना दिली आहेत, लातूर जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी यांनीही महत्त्वाच्या सूचना या बैठकीदरम्यान मांडल्या, जिल्ह्यातील अधिकारी वर्ग या सर्व सूचनांच्या संदर्भाने सकारात्मक दिसून आला त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील जनतेला वेळेत मदत मिळेल आणि त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे.