लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी तब्बल ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार १५१ हेक्टरवरील पिकांचे नूकसान झाले असून सार्वजनिक मालमत्तेलाही मोठा फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानूसार झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी ४८० कोटी रुपये लागणार आहेत. तसा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठवला आहे.
यंदाच्या पावसाळ्यापुर्वीच मे महिन्यात बेमोसमी पावसाने लातूर जिल्ह्यात धुमाकुळ घातला होता. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांस नदी, नाल्यांची पाणी पातळी वाढली होती. जुन, जुलै, ऑगस्टमध्ये ब-यापैकी पाऊस पडल्याने सर्वच प्रकल्प तुडूंब भरले होते. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला. कमी कालावधीत अधिक पाऊस अनेकवेळा झाला. जिल्ह्यातील ६० महसूल मंडळांपैकी ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला आहे. जिल्ह्यातील २ लाख ८७ हजार १५१ हेक्टरवरील खरीप पिकांचे नूकसान झाले आहे. दरवर्षी परतीचा पाऊस लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडतो. आणखी परतीचा पाऊस बाकी असल्यामुळे शेतक-यांची चिंता वाढली आहे.
लातूर जिल्ह्यात १० तालुके आहे. महसुल मंडळे ६० आहेत. ९५२ गावे आहेत. जिल्ह्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७०६ मिली मीटर आहे. जिल्ह्यातील ५९ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. दोन मोठे, ८ मध्यम तर १३५ लघू प्रकल्प आहेत. खरीप पिकाचे क्षेत्र ६.०२ लाख हेक्टर एवढे आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला, २०९ जनावरे दगावली, १ हजार ८९ घरांची पडझड झाली.
२ लाख ८७ हजार १५१ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांची नूकसान झाली. पिकांच्या नूकसान भरपाईकरीता जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. अतिवृष्टीने जिल्ह्यातील सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नूकसान झाले. रस्त्यांचे ५२ कोटींचे नूकसान झाले आहे. पुलांचे नुकसान ८८ कोटी, ग्रामीण रस्त्यांचे नूकसान २६ कोटी, ग्रामीण पुलांचे नूकसान ३० कोटी, पाटबंधारे प्रकल्प नुकसान १७ कोटी, विद्यूत व्यवस्थेचे नुकसान १.५ कोटींचे नुकसान झाले. सार्वजनिक मालमत्तेची नुकसान भरपाई देण्यासाठी २३६ कोटी रुपये लागणार आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.