मुंबई : प्रतिनिधी
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली आहे. २०२४ मध्ये भारतात ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, तर २०२३ मध्ये तो ८२० मिमी झाला होता. हा पाऊस सरासरीपेक्षा ९४.४ टक्के अधिक झाला होता.
संपूर्ण मान्सून हंगामात, देशात ८७ सेंटीमीटरच्या दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडू शकतो. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले की, या हंगामात मान्सूनच्या गाभा क्षेत्रात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे (दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्क्यांहून अधिक).
मान्सूनच्या गाभा क्षेत्रात मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि लगतच्या प्रदेशांचा समावेश आहे. या प्रदेशात बहुतेक पाऊस नैऋत्य मान्सून दरम्यान पडतो आणि शेतीसाठी त्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. वायव्य भारतात सामान्य पाऊस अपेक्षित आहे, तर ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, मध्य आणि दक्षिण भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी सांगितले की, नैऋत्य मान्सून सामान्य तारखेच्या १६ दिवस आधी मुंबईत पोहोचला आहे. १९५० नंतर पहिल्यांदाच इतक्या लवकर दाखल झाला आहे. शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाला, २००९ नंतर पहिल्यांदाच तो भारतीय मुख्य भूमीवर इतक्या लवकर दाखल झाला.
नैऋत्य मान्सून साधारणपणे १ जूनपर्यंत केरळमध्ये प्रवेश करतो. तो ११ जूनपर्यंत मुंबईत पोहोचतो आणि ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापतो. तर १७ सप्टेंबरच्या सुमारास वायव्य भारतातून माघारी मान्सूनची सुरुवात होते आणि १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचे हवामान कोरडे होते.
नैऋत्य मान्सून भारतासाठी इतका खास का आहे याचे पहिले कारण म्हणजे जून ते सप्टेंबर या कालावधीत होणा-या या मान्सूनच्या पावसाचा देशातील वार्षिक पावसाच्या ७० टक्के वाटा आहे. याचा अर्थ असा की देशाच्या पाण्याच्या गरजा बहुतांशी या पावसाने पूर्ण होतात. भारतातील ६० टक्के शेतजमीन सिंचनासाठी मान्सूनवर अवलंबून आहे. भात, मका, बाजरी, नाचणी आणि ही खरीप पिके नैऋत्य मान्सूनवर अवलंबून असतात.