35.1 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ.बाबासाहेबांच्या जयंती निमित्त राज ठाकरेंची आदरांजली

डॉ.बाबासाहेबांच्या जयंती निमित्त राज ठाकरेंची आदरांजली

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सध्या चर्चेत असलेला मराठीचा मुद्दा अधोरेखित करत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठी भाषिकांचे मुंबईसहीत संयुक्त महाराष्ट्र राज्य व्हावं यासाठी काय काय प्रयत्न केलेले यासंदर्भातील माहिती आपल्या खास आदरांजलीपर पोस्टमधून दिली आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. आज या जयंतीनिमीत्त संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला बाबासाहेबांनी या लढ्याला कसा पाठींबा दिला होता आणि इतकंच नाही तर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र नको म्हणून जे काही तर्क पुढे केले जात होते त्याला त्यांनी कसं सडेतोड उत्तर दिले होते, याचं स्मरण होणं आवश्यक आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी एक किस्सा आपल्या पोस्टमध्ये सांगितला आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या काळात, कॉम्रेड डांगे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे आणि संयुक्त महाराष्ट्र समितीच्या इतर नेत्यांनी, बाबासाहेबांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली होती आणि या लढ्यासाठी त्यांचं आणि त्यांच्या अनुयायांचे सहकार्य मागितलं होतं. यावेळेस बाबासाहेबांनी देखील माझा शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समितीच्या पाठीशी जिब्राल्टरच्या खडकासारखा उभा राहील असं सांगितलं होतं. इतकंच नाही तर पुढे मुंबईतील राजगृह हे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या बैठकांचे केंद्र बनलं. या बैठकांमध्ये आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे देखील उपस्थित असायचे, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

स्वत: बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९४८ रोजी धार कमिशनला मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असावं या मागणीला पाठींबा देणारं निवेदन दिलं होतं. या निवेदनात मुंबई हा महाराष्ट्राचाच अविभाज्य भाग कसा आहे याचं विस्तृत विवेचन आहे. आणि हे विवेचन Maharashtra As A Linguistic Province मध्ये वाचता येईल, अशी माहिती राज यांनी आपल्या पोस्टमधून दिली आहे.

हे सगळं सविस्तर सांगायचं कारण असं की बाबासाहेबांनी पुढे जाऊन मुंबई हा महाराष्ट्राचा भाग कधीच नव्हता किंवा मुंबईत फक्त मराठी भाषिकांची लोकसंख्या अधिक आहे म्हणून मुंबई महाराष्ट्राचा भाग कसा होऊ शकतो असे जे तर्क पुढे केले जात होते त्याला सडेतोड उत्तर दिले होते.ते म्हणाले होते की, मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर आक्रमणे केली म्हणून हिंदू-मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली नाही. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असे होत नाही, मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत अशीच आहे आणि ती बदलता येणार नाही, असे राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते पण…
पुढे बाबासाहेबांचं निधन झालं. पण त्यानंतर दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांच्यासारखे नेते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्वेषाने उतरले. बॅरिस्टर बी.सी. कांबळे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलकांवर होणा-या पोलिसी कारवायांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून मोरारजी देसाईंना जेरीस आणलं होतं. पुढे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. हा प्रसंग पहायला बाबासाहेब नव्हते. पण या लढ्यातील बाबासाहेबांचे योगदान हे विसरता येणार नाही, असे राज यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तर या लढ्याला काय अर्थ?
पोस्टच्या शेवट राज यांनी सध्याचा संदर्भ दिला आहे. आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसाला दुय्यम दर्जा दिला जात असताना, या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्ची केली होती, हे मराठी माणसाने विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठी म्हणून एकत्र नाही आलो तर या लढ्याला काय अर्थ? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

‘ही’ शपथ घेणे हेच योग्य स्मरण
आपण मराठी म्हणून एकत्र येणं, मराठी समाजाने जातीच्या भिंती उध्वस्त करणं आणि या प्रांताला वैभव प्राप्त करून देण्याची शपथ घेणं हे आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, असं राज ठाकरे पोस्टच्या शेवटी म्हणाले आहेत. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या युगपुरुषाला कोटी कोटी प्रणाम!’ या वाक्याने राज यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR