23.9 C
Latur
Sunday, February 2, 2025
Homeमहाराष्ट्रडॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही

मुंबई : प्रतिनिधी
ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत डॉ. मनमोहन सिंग यांना भावांजली अर्पण केली आहे.
राज ठाकरे म्हणतात, १९९१ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामाशाची होती.

एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केले. अर्थात, नरसिंह राव यांच्यासारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरे.

संसदेत भाषण करताना मनमोहनसिंग यांनी एक वाक्य वापरले होते, kno power on earth can stop an idea whose time has come.. . थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचे खरे शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.

पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग दहा वर्षे. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना ते एक वाक्य म्हणाले होते,   I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament….,याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावे, घडवावे यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलेले नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR