मुंबई : प्रतिनिधी
पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप झाला. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप झाला. आता या प्रकरणात मंगेशकर कुटुंबाने मौन बाळगणे अमानुष असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्र, भारताचे भूषण आहे. सगळ्याच सरकारांनी त्यांचे योगदान मान्य केले आहे. मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालय बांधत असताना त्यावेळच्या सरकारने मदत केली. पंडित नेहरूंनी लता मंगेशकर यांना ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाणे म्हटल्यावर सन्मानित केले होते ही देखील वस्तुस्थिती आहे. दरम्यान मी तनिषा भिसे कुटुंबियांची भेट घेतली. तनिषा भिसेंना साडेपाच तास ताटकळत ठेवण्यात आले. त्यातून त्यांचा बळी गेला आहे. मातृत्वासाठी आसुसलेल्या महिलेचा अशा पद्धतीने मृत्यू होणे ही बाब हृदयद्रावक आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेली ही पहिली घटना नाही. पैशांसाठी अडवले जाते या तक्रारी कायम येतात, मोठ्या प्रमाणावर अनियमितता आहे. डॉ. घैसास यांची बाजू घेताना डॉ. केळकर म्हणतात राहु-केतू डोक्यात आले आणि १० लाख मागितले.
इतके बेजबाबदार वक्तव्य त्यांनी केले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची बाजू सरकार घेते आहे. मंगेशकर कुटुंबाने चांगले काम केले म्हणून त्यांना मदत केली आहे. मंगेशकर कुटुंबाने या प्रकरणावर साधलेले मौन हे कर्कश आहे. ते या संदर्भात माफी मागत नाहीत, भिसे परिवाराचे सांत्वन मंगेशकर कुटुंबापैकी कुणीही केलेले नाही. किमान चौकशी करू, अनियमितता दूर करू हे काहीही म्हणत नाहीत. त्यांचे या प्रकरणावरचे मौन हे अमानुष आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचे प्रसूतीदरम्यान ३१ मार्चला निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने १० लाख रुपये अनामत रक्कम भरण्यास सांगितल्याने भिसे कुटुंबियांना दुस-या रुग्णालयात जावे लागले. या सगळ्या गोष्टी घडतानाच तनिषा भिसे यांची प्रसूती झाली. त्यांनी जुळ्या मुलींना जन्मही दिला. पण प्रसूतीनंतर तनिषा भिसे यांचे उपचारांदरम्यान निधन झाले. या प्रकरणामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीका झाली. आता मंगेशकर कुटुंबाने मौन बाळगणे अमानुष आहे असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.