यंदाचा निकाल ९४.१० टक्के, २०११ मुलांनी घेतले १०० टक्के गुण
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, यात कोकण विभागाने बाजी मारली तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला. तसेच लातूर विभागाच्या निकालातही यंदा घसरण झाली. परंतु लातूरमधील ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविल्याने पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली. या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची आज दुपारी १ वाजता पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची माहिती दिली. या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांमधून एकूण १५,५८,०२० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४६,५७९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,५५,४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यात १०० टक्के गुण मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यातील १३, नागपूरमधील ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूरमधील ११३, कोकण ९ विद्यार्थी आहेत. या सोबत ३५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे ५९ विद्यार्थी, नागपूर ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर २८ विद्यार्थी, मुंबई ६७ विद्यार्थी, कोल्हापूर १३ विद्यार्थी, अमरावती २८ विद्यार्थी, नाशिक ९ विद्यार्थी, लातूर १८ विद्यार्थी, कोकण ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करण्याची सोयदेखील करून दिली आहे. उद्यापासून म्हणजे १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नापास विद्यार्थ्यांना
मिळणार ११ वीत प्रवेश
एटीकेटी असल्यामुळे एक किंवा दोन विषयात विद्यार्थी नापास झाला तरी ११ वीत प्रवेश दिला जातो. १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण झाला आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर विद्यार्थी १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो.
१०० टक्के गुण घेतलेल्या
२११ पैकी ११३ लातूरचे
राज्यात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून लातूरमधील ११३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत देदीप्यमान कामगिरी बजावल्याचे दिसून आले, यासंबंधीची माहिती लातूर बोर्डचे विभागीय अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी दिली.
लातूर विभागीय मंडळात
धाराशिव जिल्हा अव्वल
लातूर विभागीय मंडळात ९७.३७ टक्के निकालासह धाराशिव जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. ९२.३६ टक्क्यांसह लातूर दुस-या क्रमांकावर तर ९१.९३ टक्क्यांसह नांदेड तिस-या क्रमांकावर आहे. बारावी पाठोपाठ दहावीच्या निकालातही लातूर विभागीय मंडळात धाराशिव जिल्ह्याचा दबदबा पाहायला मिळाला.
लातूर विभागात ४४६
शाळांचा १०० टक्के निकाल
लातूर विभागात ४४६ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला. तर दहा शाळांचा शून्य टक्के निकाल लागला. शून्य टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये लातूर आणि नांदेडमधल्या प्रत्येकी चार तर धाराशिव जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश आहे. लातूर विभागीय मंडळाचा दहावीचा एकूण निकाल ९२.७७ टक्के लागला.