नवी दिल्ली : मागील पाच वर्षांच्या कालावधीत नैसर्गिक तसेच अन्य कारणांमुळे ६२८ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (एनटीसीए) देण्यात आली. दुसरीकडे वाघांच्या हल्ल्यात ३४९ लोकांचा मृत्यू झाला असल्याचेही ‘एनटीसीए’कडून सांगण्यात आले. वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दोनशेपेक्षा जास्त लोक महाराष्ट्रातले आहेत.
देशात अलीकडच्या काळात २०२३ मध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१९ आणि २०२० मध्ये वाघांच्या हल्ल्यात प्रत्येकी ४९ लोकांचा मृत्यू झाला. २०२१ मध्ये हीच संख्या ५९ इतकी होती. २०२२ मध्ये ११० तर २०२३ मध्ये ८२ लोकांचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दोनशे लोकांचा मृत्यू झाला.
उत्तर प्रदेशात ५९ आणि मध्य प्रदेशात २७ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ च्या आकडेवारीनुसार देशातील वाघांची संख्या ३ हजार ६८२ इतकी होती. व्याघ्र संवर्धनासाठी केंद्र सरकारने १९७३ साली ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात केली होती. देशात सध्या ५५ व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहेत. याची व्याप्ती ७८ हजार ७३५ चौरस किलोमीटरवर पसरलेली आहे.