25.4 C
Latur
Saturday, July 6, 2024
Homeमहाराष्ट्रदेशात शैक्षणिक आणीबाणी

देशात शैक्षणिक आणीबाणी

परीक्षा घोळावरून ठाकरे, पाटील, चतुर्वेदींचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट, यूजीसी नेट परीक्षांवरून सावळा गोंधळ सुरू आहे. एनटीएमार्फत घेतली जाणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने आता परीक्षेला अवघे १२ तास शिल्लक असताना नीट पीजी परीक्षाही रद्द केली. त्यामुळे, नीट पीजी परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दुसरीकडे नीट-नेट परीक्षांमधील सरकारच्या भोंगळ कारभारावरून विरोधकांनी देशात शैक्षणिक आणीबाणी आली असे म्हणत केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर पहिल्या शंभर दिवसांत अनेक क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते, त्याप्रमाणेच अनेक क्रांतिकारी गोष्टी घडल्याही, असे म्हणत जयंत पाटील, आमदार आदित्य ठाकरे व प्रियंका चतुर्वेदी यांनीही सरकारला लक्ष्य केले आहे.

दरम्यान, पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते. मात्र, याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरश: खेळत आहे. अवघ्या १२ तास आधी परीक्षा रद्द करणे नक्की कशाचे द्योतक आहे ? मुळात अशा प्रवेश परीक्षा राज्य पातळीवर घेण्यात येऊन राज्यांना याबाबतीत अधिक स्वायत्तता दिली जावी. मात्र, केंद्र शासनाला सर्व काही स्वत:च्या हातात ठेवायचे असल्याने या अडचणी उद्भवत आहेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच, या अनागोंदीमुळे उद्या काही उद्विग्न तरुण-तरुणींनी टोकाचे निर्णय घेतले तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल, असेही त्यांनी म्हटले.

शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या परीक्षांवरून सुरू असलेल्या गोंधळावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही भूमिका मांडली आहे. देशात शिक्षण आणीबाणी लावण्यात आली, असे म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तर, ‘वन नेशन वन इलेक्शन’च्या गप्पा मारणा-या सरकारला एक परीक्षा नीट घेता येईना, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.

विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड होणार का? : आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून देशभरात सुरू असलेल्या सीईटी, नीट आणि नेट परीक्षांतील घोळावर भाष्य केले. काल नीटच्या परीक्षांसंदर्भात उत्तर द्यायला डायरेक्टर होते, पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते. विद्यार्थ्यांचे पैसे रिफंड होणार का, असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी अद्याप उत्तरपत्रिका हातात का नाही देत, असेही म्हटले. तसेच, नीट परीक्षांबाबत जो कोणी चूक आहे, त्यावर कारवाई व्हायलाच हवी, पण होईल असे मला वाटत नाही, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : चतुर्वेदी
मी म्हणेन की या देशात शैक्षणिक आणीबाणी लागू आहे, ज्याप्रमाणे परीक्षा रद्द केल्या जात आहेत, एका पाठोपाठ एक परीक्षा रद्द होत आहेत, पेपर पुढे ढकलले जात आहेत. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जबाबदारी घेत नाहीत. देशातील नीट परीक्षांच्या चौकशीला त्यांनी नकार दिला आहे. केवळ एनटीए अध्यक्षांची बदली करून काम झालं का, संपूर्ण शिक्षण विभाग यास जबाबदार असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR