कोल्हापूर : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूरमध्येही कोरोनाबाधित महिलेचा बळी गेला आहे. ७५ वर्षीय महिलेवर गेल्या चार दिवसांपासून सीपीआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र, आज (१ जून) उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पाचगावात असून ती कोरोनाबाधित होती.
दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर पालिका कर्मचा-यांनी पीपी किट नसल्याने संबंधित महिलेवर अन्त्यसंस्कार करण्यास नकार दिला. राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ दोघेही कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे, देशात कोरोना विषाणूच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,७८३ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, २२ मे रोजी भारतात १५७ रुग्ण होते. ९ दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक १४०० रुग्ण आहेत. त्याच वेळी, महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीत ४३६ सक्रिय रुग्ण आहेत. जानेवारीपासून कोरोनामुळे २९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी गेल्या दोन दिवसांत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी, बंगळुरूमध्ये एका ६३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्याला दोन्ही लसींसह बूस्टर डोस देखील देण्यात आला होता. त्याच वेळी, दिल्लीत एका ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-केरळमध्ये सर्वाधिक ८-७ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात ९ हजारांहून अधिक कोविड चाचण्या
महाराष्ट्र सरकारने सांगितले की शनिवारी कोविडचे ६८ नवीन रुग्ण आढळले. तर जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ७४९ रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून राज्यात ९,५९२ कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत.