बीड : प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरलं आहे. सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांना सातत्याने लक्ष्य केले होते. त्यानंतर आता सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवास्थानी जाऊन भेटले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. या भेटीवरुन सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.
एकीकडे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीचे समर्थन केले आहे. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत गैर काय असा सवाल अजित पवार यांनी केला. माणुसकीच्या नात्याने दोघांची भेट झालेली आहे आणि देशमुख कुटुंबीयांच्या भावना देखील योग्य आहेत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
एक मंत्री आहेत तर दुसरे आमदार आहेत यशवंतराव चव्हाण साहेबांनी आपल्याला सुसंस्कृतपणा शिकवलेला आहे मागे आम्ही सुद्धा एकमेकांच्या विरोधात होतो परंतु आम्ही भेटायचं बोलायचं अशा पद्धतीने ते गेले होते बाकी काही नाही त्याचा वेगळा अर्थ काढू नका. समजा तुम्ही जर आजारी पडलात आणि जर तुमचे एखाद्या व्यक्तीसोबत जमत नसेल, पण तो तुमची विचारपासून करण्यासाठी आला तर त्याच काही चुकीचं आहे का?, असा सवाल अजित पवार यांनी केला.
देशमुख कुटुंबांच्या मागण्या योग्य
संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झालेली आहे. कोणालाही त्याचे वाईट वाटणारच. त्यांची पत्नी असेल दोन लहान मुले असतील, बंधू असतील त्यांचे कुटुंब असेल. त्या सगळ्यांच्या मनामध्ये ही भावना येणे साहाजिक आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या योग्यच आहेत, असंही अजित पवार म्हणाले.