रेणापूर/लातूर : प्रतिनिधी
रेणापूर नगरपंचायतीमध्ये मागील आठ वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या भाजपकडून अतिशय भ्रष्ट कारभार झाला. त्याला जनता कंटाळली असून रेणापूर नगरपंचायतीत आता बदल हवा आहे, अशी भावना मतदारांची झाली आहे. आजतागायत काँग्रेस पक्षाने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. त्यामुळे सुरक्षित, सुशिक्षीत आणि सुंदर शहरासाठी रेणापूरकरांनी काँग्रेस पक्षाला भरभरून साथ द्यावी व येत्या २ डिसेंबर रोजी होणा-या नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी उभे असलेल्या सर्व काँग्रेस उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करा असे आवाहन लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
रेणापूर नगर पंचायत निवणुकीच्या निमित्ताने शहरातील बुधवारी हाके तांडा नेहरू नगर राजेवाडी येथे काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजयकुमार चक्रे, गणेश ठावरे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. अर्चना प्रदीप माने यांच्या प्रचारार्थ संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान संवाद बैठकीस मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी काँग्रेसचे उमेदवार, पक्ष निरीक्षक, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक मतदार, पुरुष, महिला जेष्ठ नागरिक उपस्थित होते

