लातूर : प्रतिनिधी
भारताचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला त्या घोषणेचे माजी मंत्री, सहकारमहर्षि दिलीपराव देशमुख यांनी स्वागत केले आहे. दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात त्यांच्या आर्थिक धोरणामुळे, आज भारताची अर्थ व्यवस्था मजबूत झाली आहे. त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या रुपाने देशाला एक उत्तम अर्थमंत्री दिला. त्यांनी अनेक चांगले निर्णय घेत देशाला उंचीवर नेऊन ठेवले यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता, हे विसरता येणार नाही
माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव एक अफाट बुद्धिमत्ता असलेले राजकीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे महाराष्ट्राशी नाते घट्ट होते. त्यांनी रामटेक लोकसभा मतदारसंघातून २ वेळा लोकसभा निवडणूक लढवली. सन १९९१ मध्ये रुपयाचे अवमूल्यन करण्याचा धाडसी निर्णय पंतप्रधान नरसिंह राव सरकारने घेतला होता, असे विविध धाडसी निर्णय, अफाट बुद्धिमत्ता, मातब्बर व्यक्तिमत्त्व असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारताचे यशस्वी पंतप्रधान म्हणून नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला याचा आम्हाला आनंद आहे, असेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले.