मुंबई : शेतक-यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागले आहेत अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवारांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे.
दरम्यान, शेतक-यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना सपकाळ म्हणाले, शेतक-यांच्या कर्जवसुलीबाबत बोलताना सत्ताधा-यांची ना जीभ थरथरते ना यांना लाज-शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू-वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत.
राज्यातील शेतक-यांना यापूर्वी वीजमाफी, पीक कर्जाच्या व्याजात सवलत, दुधाचे अनुदान देण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तर सुमारे ४५ हजार कोटींचा बोजा सरकारवर असल्याने कर्जमाफीसारखी सध्या तरी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे आता शेतक-यांसह कर्जदारांनी ३१ मार्चपूर्वी बँकांमध्ये कर्जाची परतफेड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी ट्विट केले आहे.
लाडक्या बहिणींना फसविले
लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. २१०० चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर १५०० रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन १० लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि २१०० रुपये मिळण्यासाठी ५ वर्षे वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत, अशी टीका हर्षवर्धन सपकाळांनी अजित पवारांवर केली आहे.