निलंगा : प्रतिनिधी
गत दहा दिवसापासून अवकाळी मुसळधार पावसाने शेतक-यांच्या पिकांचे नुकसान व पडझड झालेल्या घरांची काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके व पक्षाच्या शिष्टमंडळाने पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रदेश काँग्रेसचे सचीव अभय साळुंके यांनी केली आहे.
गत दहा ते बारा दिवसांपासून सतत अवकाळी पावसाने निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक भागात दररोज झोडपून काढले आहे. वास्तविक सप्टेंबर ते आक्टोबरमध्ये वाहणारे ओढे, नाले मे महिन्यात तुडुंब भरून वाहत आहेत. मांजरा व तेरणा नदीवरील बॅरेजचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. उन्हाळ्यात थोड्याफार पाण्याच्या उपलब्धतेवर मोठ्या कष्टाने शेतक-यांनी पिकवलेले कांदे, टोमॅटो इतर भाजीपाला व टरबूज पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील दगडवाडी येथील शेतकरी उत्तम वसंतराव खोंड या शेतक-यांचे जवळपास आडीचशे क्विंटल काढून ठेवलेले कांदे व दोन एकर क्षेत्रावरील टरबूजांचे मोठे नुकसान होऊन त्यांना जवळपास आठ लाखांचा फटका बसला आहे.
शेतीवर अवलंबून असलेले खोंड कुटुंबाचे जीवन अचानक रस्त्यावर आल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे म्हणून त्यांना अश्रू अनावर होत आहेत. तसेच तालुक्यातील माकणी थोर येथील शेतकरी गणेश आकडे यांचे दोन एकर टोमॅटो टमाटे, झटिंग आकडे, सतिश आकडे, भागवत आकडे यांचे एक हेक्टर टरबूज जागीच खराब होऊन दोन्ही शेतक-यांचे प्रत्येकी तीन लाखांचे नुकसान झाले तर सततच्या पावसाने निवृत्ती आकडे, शिवाजी आकडे यांचे राहते घर कोसळले सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दरम्यान बुधवारी रोजी माजीमंत्री आ. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके व शिष्टमंडळाने तालुक्यातील दगडवाडी, माकणी थोर सह तालुक्यातील इतर ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतक-यांना दिलासा देण्याचे काम केले.
शेतकरी आपल्या अडचणी आणि झालेल्या नुकसानीची माहिती देताना त्यांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळावरून अभय साळुंके यांनी महसूल प्रशासनाला संपर्क साधून तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतक-यांना नियमाच्या बाहेर जाऊन ठोस मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी माजी प.स.सभापती अजित माने, अंबादास जाधव, पंकज शेळके, अॅड नारायण सोमवंशी, मुजीब सौदागर, धनाजी चांदूरे शकील पटेल, परमेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.