मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना महिना २१०० रुपये देण्याचे तसेच शेतक-यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ता आल्यानंतर आता राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा हवाला देत लाडकी बहीण आणि शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत महायुती सरकारने हात आखडता घेण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या संदर्भात एक्सवरून केलेल्या टीकेमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी अशी मराठीत एक म्हण आहे. पण महायुती सरकारने ‘निवडणुकीपुरता शेतकरी आणि मतांपुरती लाडकी बहीण’अशी नवी म्हण रूढ केली आहे. कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतक-यांची मते घेतली.
सत्तेवर येताच कर्जमाफी मिळणार नाही चूपचाप पैसे भरा, असे मस्तवालपणे सांगत आहेत. विविध कारणे देऊन सातत्याने लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले जात आहे. महाभ्रष्ट महायुती सरकारकडूत फक्त जनतेचा विश्वासघात आणि फसवणूकच सुरू आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.