मुंबई : प्रतिनिधी
पहलगाम येथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेने चोख उत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेने केला. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
पहलगाम हल्ल्याच्या १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून प्रत्युत्तर दिले. दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणी एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. यानंतर देशभरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, देशवासी आनंद व्यक्त करत आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणा-या दहशतवादी कारवाया विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद सहन करणार नाही हाच संदेश आज या कारवाईमधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे असे विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.
याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आणि आज देखील दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले. दहशतवादाविरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणा-या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबाच आहे ,असे वडेट्टीवार म्हणाले.